Connect with us

गोवा खबर

सतराव्या मिफ्फच्या राष्ट्रीय स्पर्धा गटात आलेले चित्रपट आशय आणि दर्जा दोन्ही दृष्टीने उत्तम होते, त्यामुळे पुरस्कारांची निवड एकमताने आणि सहज झाली- राष्ट्रीय स्पर्धा गटातील ज्यूरी सदस्यांचे मत

Published

on

Spread the love



राष्ट्रीय स्पर्धा गटातील परीक्षकांनी आज ‘मिफ्फ संवाद’ मध्ये साधला संवाद

 

 

 

गोवा खबर:मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ 2022 मध्ये राष्ट्रीय स्पर्धा गटात दाखवले गेलेले अनेक चित्रपट उत्तम होते, चित्रपटांची निवड चांगली होती, त्यामुळे परीक्षक म्हणून आमच्यात बहुतांश वेळा एकमत झाले,असे मत, या महोत्सवात राष्ट्रीय स्पर्धा गटासाठी ज्युरी म्हणजेच परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या मान्यवरांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

या महोत्सवातील राष्ट्रीय स्पर्धा गटातले चित्रपट, पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया, निकष, चित्रपटांचे वैविध्य या सगळ्यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्याशिवाय, माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पट निर्मितीत आलेल्या किंवा येऊ पाहणाऱ्या नवोदित कलावंतांनी काय काळजी घ्यावी, सिनेमा बनवतांना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याच्या सूचनाही त्यांनी केल्या. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पटांच्या स्वरुपात काळानुरूप होत असलेल्या बदलांविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

 

संजित नार्वेकर (भारत), यांच्या अध्यक्षतेखाली, सुभाष सेहगल (भारत), जयश्री भट्टाचार्य (भारत), ऍश्ले रत्नविभूषण (श्रीलंका) आणि तारीक अहमद (बांग्लादेश) यांनी या महोत्सवात राष्ट्रीय परीक्षक (ज्यूरी) म्हणून काम पाहिले.

सिनेमा बघतांना आशय, कथावस्तू आणि तंत्रज्ञान यापैकी कशावर भर दिला जातो, यावर भाष्य करतांना, तारीक अहमद म्हणाले, की सिनेमा कसा आहे, यावर ते अवलंबून असतं, काही सिनेमासाठी आशय महत्वाचा ठरतो, तर काही सिनेमासाठी तंत्रज्ञान महत्वाचे असते. याच मुद्द्यावर अधिक प्रकाश टाकत संजित नार्वेकर म्हणाले, की सिनेमा आधी लोकांच्या मनाला भिडला पाहिजे, त्याचा प्रभाव पडायला हवा, हे सर्वात महत्वाचे आहे. तंत्रज्ञान आणि इतर सगळ्या गोष्टी नंतर येतात. त्यामुळे आम्हीही त्याच दृष्टीने आधी सिनेमाकडे पहिले. नंतर त्याच्या बारकाव्यावर संकलन सुभाष सेहगल यांनी बारकाईने लक्ष दिले. अनेक चित्रपटांचा दर्जा यावेळी उत्तम होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सिनेमातील विषयांच्या वैविध्याविषयी बोलतांना ते म्हणाले, सामाजिक विषयांवरील अनेक सिनेमे यात होते. अनेक वेगवेगळे विषय हाताळले गेले, विषय सारखे असले तरीही, त्याला वेगवेगळ्या प्रकारे सादर केले होते. त्यामुळे, कंटाळवाणे झाले नाही.

अॅनिमेशन चित्रपटांमध्ये देखील केवळ मनोरंजन नव्हते,तर त्यातही अनेक गंभीर विषय प्रभावीपणे हाताळले गेले, असेही नार्वेकर यांनी सांगितले. सिनेमाची मांडणी कशी असावी, हेही विषयानुसारच ठरवले जावे. महत्वाचे हे आहे, की सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवता आले पाहिजे. असे नार्वेकर म्हणाले.

ह्या महोत्सवात राष्ट्रीय स्पर्धा गटासाठी निवडले गेलेले चित्रपट, विषय, हाताळणी, तंत्रज्ञान, या सगळ्याबाबत विविध फुलांच्या एखाद्या पुष्पगुच्छसारखे होते, असे मत, सुभाष सरकार यांनी व्यक्त केले.

सिनेमाशी अर्थकारण जोडलेले असतेच, आपल्या सिनेमातून निर्मात्याला काहीतरी मिळायला हवे, तरच त्याला पुढे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे नार्वेकर यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी आज नवनवीन माहितीपट निर्माते, ज्यांचे चित्रपट आम्ही पहिले, त्यांनी प्रचंड मेहनत घेत, केवळ चित्रपट निर्मितीचा ध्यास घेऊन, कशाचाही विचार न करता हे सिनेमे तयार केले, त्याबद्दल सर्व परीक्षकांनी त्यांचे कौतूक केले.

सिनेमामध्ये माहितीपट, लघुपट अशी विभागणी करणाऱ्या रेषा आता पुसट झाल्या आहेत, आता निर्माते-दिग्दर्शक देखील, सिनेमाकडे सिनेमा म्हणून बघतात, आणि प्रेक्षकही त्याकडे तसेच बघतात, असेही नार्वेकर  पुढे म्हणाले.

 

ज्यूरी मंडळाविषयी माहिती:  

संजित नार्वेकर :  विविध माध्यमांमध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट इतिहासकार, लेखक, प्रकाशक आणि माहितीपटकार. ‘मराठी सिनेमा इन इंट्रोस्पेक्ट’ (1995) ह्या पुस्तकाला सिनेमाविषयक उत्कृष्ट पुस्तक म्हणून सुवर्ण कमळ.

 

सुभाष सेहगल :  भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी उद्योगात 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संकलक. विद्यार्थीदशेत ‘फिल्म अँड टेलिविजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये संकलन विषयात सुवर्ण पदक विजेते. मुंबईतील चित्रपट उद्योगासह हिंदी व पंजाबी चित्रपटांच्या संकलनासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे विजेते.

 

जयश्री भट्टाचार्य : अग्रगण्य रंगमंच कलाकार, चित्रपटकार, पुरस्कार विजेते माहितीपट, लघु व चित्रपटांच्या दिग्दर्शिका. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षक व ईशान्य भारतात काही रंगमंच कार्यशाळांचे आयोजन. बुद्धदेव दासगुप्ता व ऋतूपर्णो घोष यांच्या उत्तोरा चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाने चित्रपट कारकीर्दीची सुरुवात. ‘मोंदो मेयेर उपाख्यान’ ‘चोखेर बाली’, ‘शुभो महुरत’, ही काही विशेष उल्लेखनीय कामे.

 

ऍश्ले रत्नविभूषण : पत्रकार, लेखक, चित्रपट समीक्षक. श्रीलंकेतील ‘आशियाई चित्रपट केंद्रा’चे संचालक व ‘सिनेसिथ’ पत्रिकेचे संस्थापक संपादक. श्रीलंकेतील चित्रपट जगासमोर उलगडून मांडणारे अग्रणी. श्रीलंकेतील चित्रपटाची सुरुवातीची वर्षे आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगविषयक शोधनिबंधांचे व श्रीलंकेतील चित्रपटाचा इतिहासविषयक लेखक. ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशिया पॅसिफिक सिनेमा’चे विद्यमान सदस्य आणि परीक्षक समन्वयक.

 

तारीक अहमद : 25 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक माहितीपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे चित्रपटकार आणि निर्माते. सिनेमाविषयक पुस्तकांचे लेखक. तळागाळातील व्यावसायिकांना संधी देणाऱ्या माध्यमे व संवाद संस्थेचे दशकभरासाठी नेतृत्व. ह्या माध्यमातील अनुभव व ज्ञानाधारे बांग्लादेशात स्थानिक व आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत विविध उल्लेखनीय माहितीपट साकार.