Connect with us
गोवा खबर2 years ago

महान मराठा योद्ध्याला त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

                    १९ फेब्रुवारी हा भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी आपण थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो. गोव्यातही, जात, पंथ आणि धर्माची पर्वा न करता लोक या महान मराठा योद्ध्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या वार्षिक उत्सवात सक्रियपणे सहभागी होतात. राज्यभरात या महत्त्वाच्या दिवसाचे स्मरण करताना लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये खूप उत्साह दिसून येतो.                माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे ग्रामपंचायत बांदोडा आणि जिल्हा पंचायत सदस्य कवळे आणि इतर संबंधित खात्यांच्या संयुक्त विद्यमाने फर्मागुडी फोंडा येथे मराठा योध्यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या राज्यपातळीवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. समारंभानिमित्ताने हायस्कुल आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने  श्री गणपती देवस्थानाच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला दरवर्षी विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य आणि काळ कार्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.                गोव्यात हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुख्य राज्यस्तरीय समारंभाच्या किमान दहा दिवस अगोदर जोरदार तयारी सुरू आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याव्यतिरिक्त पर्यटन, सांबाखा, वीज आणि शिक्षण खाते हा कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी मनापासून सहकार्य करतात. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम तालुकास्तरावर शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करून साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य व वारसा यावर ऐतिहासिक नाटके सादर केली जातात.                गोव्यात ४५० वर्षे पोर्तुगीज राजवट असतानाही गोव्यात हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांचे योगदान सर्वज्ञात आहे. नव्याने जिंकलेल्या गोवा राज्याचे आठ तालुके शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होते, शिवरायांची पोर्तुगीज विरुद्ध बार्देश स्वारी, श्री सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्बांधणी, पोर्तुगीजांना धमकविण्यासाठी बेतूल येथे किल्ला बांधणे आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतरच्या मराठा राजा यांचा पोर्तुगीजांविरुद्धचा संघर्ष. एक भारतीय म्हणून आपण या तेजस्वी देशभक्ताचे जीवन आणि कार्य स्वीकारले पाहिजे.                किंबहुना गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ राज्य सरकारने राज्यस्तरावर हा कार्यक्रम साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतरच या वार्षिक सोहळ्याला गती आणि जल्लोष प्राप्त झाला.         मागील वर्षांप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी करण्याची सरकारची योजना आहे, पर्यटन खात्याच्या अंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राज्यातील फार्मगुडी येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त कार्यक्रम साजरे करणार आणि मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.         पणजी, म्हापसा, मडगांव, मुरगांव, फोंडा आणि सांखळी या सहा नगरपालिकांना आणि त्यांच्या समित्यांना शिवजयंती आयोजित करण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रूपये सरकार एक वेळचे अनुदान देऊन मदत करील. मुख्य शिवजयंती कार्यक्रम १९ फेब्रुवारी रोजी डिचोली येथे होणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षी त्यांना योग्य ती आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमांचा उद्देश आहे. सरकारचा हा उपक्रम युवा पिढीला शिवाजी महाराजांचे कार्य, तत्त्वे आणि विचार याविषयी प्रबोधन करण्यासाठी आणि गोवा राज्य आणि संपूर्ण देशासाठी त्यांच्या भरीव योगदानाची जाणीव करून देण्यासाठी निश्चितच मदत करील.         शिवाजी महाराजांच्या ३५० वर्षांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ सरकारने अलीकडच्या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये पुरातत्त्व संचालनालयाने आयोजित केलेल्या बेतुल किल्ल्यावरील उत्सवाबरोबरच पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेल्या शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर शिव शौर्य रॅलीचाही समावेश आहे.                 आम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासक होते आणि सुशासन देण्यासाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शौर्य, पराक्रम, शारीरिक क्षमता, आदर्शवाद, संघटन कौशल्य, काटेकोर आणि नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धैर्य, दूरदृष्टी असे सर्वोत्कृष्ट गुण होते. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महत्त्वाचे किल्ले जिंकून नवीन बांधले.         शिवाजीचा सर्वात मोठा वारसा मराठा साम्राज्याचा पाया घालत होता ज्याने मुघल साम्राज्याची लष्करी आणि आर्थिक ताकद आणि प्रतिष्ठा कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावfली.                शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या जीवनकाळात समाजातील दीन-दलित आणि वंचित घटकांच्या मनात स्वाभिमान, पराक्रम, स्वराज्याप्रती निष्ठेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. ते भारताच्या महान राष्ट्रीय नायकांपैकी एक होते.                त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी त्यांची तत्त्वे, कार्ये आणि सद्गुण तरुण पिढीच्या मनात बिंबवूया. श्री प्रकाश नाईक, माहिती अधिकारी

Advertisement