गोवा खबर:कोविड 19 महामारीने आपल्या सर्वांच्याच जीवनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणींची चिंता, जवळच्या आणि प्रियजनांचा मृत्यू आणि लांबलेल्या टाळेबंदीमुळे झालेले सामाजिक विलगीकरण यामुळे आपल्या जगात अक्षरशः उलथापालथ झाली. महामारीने झालेल्या मानसिक परिणामांबद्दल अजूनही अभ्यास सुरू आहे. समाजाच्या भावना, विचार आणि अस्वस्थता यांचा वेध घेणारी कला म्हणून चित्रपटसृष्टी या सर्व घडामोडींकडे डोळेझाक कशी करू शकली असती? चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या कथा सांगण्यासाठी कोविड महामारीची संकल्पना निवडणे त्यामुळे अगदी स्वाभाविक आहे. 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोविड 19 ही मध्यवर्ती संक्लपना असलेल्या उत्कृष्ट चित्रपटांचा एक विभाग देखील आहे.
कोविड महामारी दरम्यान मानवी संवाद, त्यांचा ताण, कंटाळा, एकटेपणा, तुटलेपणाची भावना यासारख्या मिश्रित समस्यांना हे चित्रपट स्पर्श करतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा, ईशान्येतील चित्रपट, विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट, मेक्सिकन अॅनिमेशन आणि पोलंडचे चित्रपट यांसारख्या विविध विभागांमध्ये या चित्रपटांचा समावेश आहे.
चला तर मग कोविड काळातील आठवणींचा मागोवा घेणाऱ्या #MIFF2022 चित्रपटांवर दृष्टीक्षेप टाकूया.
1. ओसीडी
कोविड-19 च्या जागतिक विलगीकरणाचा काळ यात चित्रित केला आहे. यामुळे एका तरुण जोडप्याचे वैवाहिक जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. नवरा अतिसंवेदनशील आहे आणि बायको त्याच्या संवेदना समजू शकत नाही. अशात नेहमीप्रमाणे वादविवाद व्हायला हवे होते, परंतु गोष्टी वेगळ्या प्रकारे घडतात.
दिग्दर्शक: अली आझादिखाह

2. टुगेदर
सगळ्यांसाठीच अत्यंत अस्वस्थतेच्या ठरलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यानचा काळ यात मध्यवर्ती आहे. मुनमुन, एक स्थलांतरित घर कामगार आणि तिची घरमालक, रेखा, यांचे भांडण झाले आहे. त्यांना महामारीत टाळेबंदी दरम्यान एकाच छताखाली राहावे लागते. रेखाचा पती राजेंद्रला, कोविड-19 चा तीव्र संसर्ग झाला आहे आणि रेखा स्वतः संधिवाताची रुग्ण आहे. या दोघांची काळजी मुनमुनला घ्यावी लागते. इकडे राजेंद्रची प्रकृती बिघडत असताना मुनमुनच्या सोळा वर्षांच्या मुलीला संसर्ग झाल्याने, मुनमुनला तातडीने घरी जावे लागते. संकटाच्या काळात सहयोगाची देवाणघेवाण होते तेव्हा बदलणाऱ्या भावना आणि सामाजिक स्तरातील अंतर याचा शोध या चित्रपटात घेतला आहे.
दिग्दर्शक: आझाद आलम
3. द अनसर्टेन इअर्स (हुन किर्ह)
कोविड-19 महामारीने थैमान घातले तेव्हा देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मिझोराममध्येही जनजीवन ठप्प झाले. टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून चित्रपट निर्मात्याने, त्याच्या कॅमेऱ्याने आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण केले. आपल्याला महामारीच्या काळातील जीवनाची झलक यात मिळते आणि समाजाने अर्थात सर्वसामान्य आणि वैद्यकीय स्वयंसेवकांसारख्या आघाडीवर कार्यरत कामगारांनी हाताळलेली परिस्थितीही यात दाखवली आहे.
दिग्दर्शक: नेपोलियन आर.झेड. थंगा

4. हालात
हा चित्रपट टाळेबंदी- स्थिरता आणि रिकाम्या पेटीतल्या पोकळीसारखे सारे शून्य आहे असा भावविचार मांडतो. सरणीऱ्या वेळेचे भान नाही. शून्यता. चिंता, परमानंद आणि अनिश्चित उद्याच्या संमिश्र आशा असा कोलाहल यात कैद केला आहे.
दिग्दर्शक : स्वानंद कोट्टेवार

5. डे ड्रीमिंग
टाळेबंदीत घरात अडकलेल्या कलाकाराचे दिवास्वप्न पाहणे यात दाखवले आहे.
दिग्दर्शक: कथा

6. अटेन्शन अॅट टेन्शन
महामारीच्या काळात दिग्दर्शकाला कोणत्या ताणाचा सामना करावा लागला याचे चित्रण चित्रपटात आहे. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. उत्तर शोधण्याच्या आशेने वहीत नोंदी करते. ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे, याचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे.
दिग्दर्शक: अझलिया प्रमादिता मुचरांस्याह
7. ईफ…ईफ…ईफ
टाळेबंदीच्या काळातील वास्तव या चित्रपटात मांडले आहे. इतके दिवस निसर्गापासून तुटून राहिल्यानंतर जगभरातील माणसांना आलेले एकसूरीपणाचे दुःख यात दाखवले आहे.
दिग्दर्शक: मसादूर रहमान

8. सर्फिंग फॉर द नेरेटीव
भारतात 2020 मध्ये आठ महिन्यांची टाळेबंदी लागली होती. त्या काळात बनलेला हा चित्रपट, एकत्र राहण्याबाबत अस्वस्थता आलेल्या कुटुंबाच्या जीवनाचा शोध घेतो.
दिग्दर्शक: श्रेष्ठ कोव्वल
9. माय डियर क्वॉरंटाइन
हा चित्रपट म्हणजे महामारीबद्दलची एक साधीसरळ कथा आहे – एकाकीपणा, एकटेपणा आणि कंटाळवाण्या काळाचे काव्यात्मक चित्रण यात केले आहे.
दिग्दर्शक: इवा मारिया वोल्स्का