पुनरुज्जीवन म्हणजे निर्मात्याचा हेतू, कलात्मक एकात्मिकता आणि चित्रपटाचे पूर्णत्व यांचे आकलन करणे
गोवा खबर:चित्रपटाचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे एक प्रकारची कला आहे कारण हे काम करणाऱ्याला त्या कलाकाराची दृष्टी आणि विचार यांचा वापर करावा लागतो जेणेकरून मूळ निर्मात्याच्या दृष्टीकोनाशी ही प्रक्रिया सुसंगत आहे ना हे सुनिश्चित करावे लागतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते, संग्रह अभ्यासक आणि पुनरुज्जीवनकर्ते शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मास्टरक्लास या सत्रामध्ये बोलताना आज हे मत व्यक्त केले.

पुनरुज्जीवन प्रक्रियेत केवळ फिल्मचे भौतिक नुकसान किंवा खराब होणाऱ्या फिल्मची दुरुस्ती यांचाच समावेश नसून पुनरुज्जीवन करताना, मूळ निर्मात्याचा उद्देश, कलात्मक एकात्मिकता, अचूकपणा आणि पूर्णत्व यांना देखील विचारात घ्यावे लागते, असे डुंगरपूर म्हणाले.
पुनरुज्जीवन प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेले पाच घटक त्यांनी अधोरेखित केले. यामध्ये अधिग्रहण, जतन, नक्कल तयार करणे, पुनरुज्जीवन आणि उपलब्धता यांचा समावेश आहे.
“भारतामध्ये चित्रपट म्हणजे एक व्यावसायिक प्रकार या दृष्टीने पाहिले जाते, कला म्हणून त्यांचा विचार होत नाही. त्यामुळे पुनरुज्जीवन प्रक्रियेसाठी हाच आधार मानून त्यावर संपूर्ण प्रक्रियेची उभारणी होते. याच कारणामुळे आपण भारताचा पहिला बोलपट आलम आरा आणि पहिला रंगीत चित्रपट किसान कन्या यांसारखे जुन्या कलाकृती आणि इतर अनेक चित्रपट आपण गमावले, अशी खंत डुंगरपूर यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी एकाचवेळी अनेकांचे डिजिटायजेशन आणि दर्जेदार पुनरुज्जीवन यांमधील फरकासंदर्भात चर्चा केली. त्यांच्या चर्चेमध्ये संपूर्ण पुनरुज्जीवन प्रक्रिया मांडण्यात आली. यामध्ये थेट संशोधन आणि पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या कामासाठी लागणारी उत्तम दर्जाची विविध प्रकारची सामग्री कशा प्रकारे मिळवली जाते, प्रक्रियेपश्चात उत्तम प्रत कशी मिळवावी आणि पुनरुज्जीवित फिल्मचे आयुष्य कसे वाढवावे याविषयीच्या माहितीचा समावेश होता. यावेळी त्यांनी उदय शंकर यांच्या कल्पना, जळालेल्या निगेटिव्हमधून पुनरुज्जीवित केलेल्या सत्यजित रे यांच्या अप्पू ट्रायॉलॉजी आणि कान चित्रपट महोत्सवात जागतिक प्रदर्शन झालेल्या अरविंदन्स थम्प यांसारख्या जागतिक दर्जाच्या पुनरुज्जीवन प्रक्रियांची काही उदाहरणे दिली.
वक्त्याविषयी
शिवेंद्र सिंग डुंगरपूर हे एक पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट निर्माते, जुन्या चित्रपटांचे जतनकर्ते आणि पुनरुज्जीवनकर्ते आहेत. “सेल्युलॉईड मॅन”, “द इममॉर्टल्स” आणि “झेकमेट- इन सर्च ऑफ जिरी मेन्झेल” या त्यांच्या फिल्म्ससाठी ते ओळखले जातात. त्यांनी 2001 मध्ये डुंगरपूर फिल्म्सची स्थापना केली आणि 2014 मध्ये हेरिटेज फाउंडेशनची देखील स्थापना केली. 2012 मध्ये त्यांना नामवंत चित्रपट तज्ञ, जतनकर्ते आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक पी के नायर यांच्या जीवनावर आधारित “द सेल्युलॉईड मॅन” माहितीपटासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले.