~ साधा दिसणारा शर्ट, हा कसा शिक्षण आणि प्रगतीचे वसाहती प्रतीक झाला, हे पिल्लई यांनी सांगितले.
~ ब्रिटिशांना भारतीय दरबारात बूट घालून प्रवेश करण्याची परवानगी मिळण्यासाठी कित्येक वर्षे वाट पाहावी लागली.
गोवा खबर: साधा शर्ट, बूट व चप्पल ह्या आपल्याला रोजच्या, सामान्य वस्तू वाटतात. पण ह्याच गोष्टी सत्ता, वर्गभेद आणि वसाहतवादयांच्या प्रतीक बनल्या, असे विचार इतिहासकार व लेखक मनु एस. पिल्लई यांनी म्युझियम ऑफ गोवा, पिळर्ण इथे झालेल्या चर्चासत्रात मांडले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’च्या माजी अध्यक्षा सीमा मुस्तफा यांनी संवाद साधला.
‘Faith Lines: Syncretism, Conflict and the Stories We Tell’ या शीर्षकाखालील चर्चेत सत्ता आणि श्रद्धा यांचे नाते तसेच दैनंदिन सवयी कशा समाजातील स्तर आणि भेदभाव दर्शवतात यावर चर्चा झाली.
मनु पिल्लई म्हणाले की, साधा शर्टसुद्धा वसाहती प्रभावामुळे आला आणि तो प्रगतीचे व शिक्षणाचे चिन्ह बनला. “मी शर्ट का घातला आहे? कारण शर्ट म्हणजे मी शेतकरी नाही, मी नोकरी करणारा आहे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले. त्यांनी हेही नमूद केले की बूट हेही जात आणि लिंग यानुसार वापरले जात असत.
मनु एस. पिल्लई हे भारतीय इतिहासकार असून ते भारताचा वेगवेगळ्या थरांवरचा इतिहास शोध लावल्यामुळे. त्यांनी The Ivory Throne आणि Rebel Sultans यांसारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
ते पुढे म्हणाले, ब्रिटिश आणि भारतीय शासक यांच्यातील नातेसंबंध हळूहळू बदलत गेले. उदाहरणार्थ, वॉरेन हेस्टिंग्ज, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, यांना भारतीय दरबारात इतरांसारखेच जमिनीवर बसावे लागायचे. नंतर मात्र ब्रिटिशांनी खुर्च्यांची आणि बूट घालून दरबारात येण्याची मागणी केली. “हैदराबादमध्ये एका ब्रिटिश अधिकार्याला निजामाच्या दरबारात बूट घालून जाण्याची परवानगी मिळेपर्यंत पिढ्यानपिढ्या लागल्या. ही परवानगी मिळाल्यावर एवढा तणाव निर्माण झाला की, कुठलीही आपत्ती आली तर तत्काळ कारवाई करता यावी यासाठी ब्रिटिश सैन्य जवळ ठेवू लागले,” असे पिल्लई म्हणाले.
सांस्कृतिक एकरूपतेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की अनेक वेळा धर्मप्रचारकांनी स्थानिक हिंदू प्रतीकं जसे की भगवी वस्त्रे, तिलक, जानव्हं, वापरून ख्रिश्चन धर्म प्रसार केला. “त्यांनी ख्रिश्चन धर्माला ब्राह्मणी स्वरूप दिले. त्यांनी स्थानिक संस्कृतीत बदल घडवून त्यांना आपल्या चौकटीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा त्यांच्या इच्छेविरुद्धही त्यांचा हा प्रयत्न झाला,” असे पिल्लई म्हणाले.
इतिहासातील हिंसाचार पुन्हा मतभेद निर्माण न करता कसा मांडावा ह्या मुस्तफांनी विचारलेल्या प्रश्नावर, “हिंसाचार टाळता येत नाही, पण त्याचा संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे. बहुतेक समाजांनी त्या काळानंतर भुतकाळ विसरून पुढे वाटचाल केली आहे. लोकांना भूतकाळाची जाणीव आहे, पण त्याकडे पाहून पुढे कसे जायचे हेही त्यांना माहिती आहे असे,” पिल्लई यांनी उत्तर दिले.