गोवा खबर : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या चांद्रभूमीवर विक्रम लॅण्डर सुरक्षितपणे उतरवणाऱ्या आणि प्रज्ञान रोव्हर तैनात करणाऱ्या चांद्रयान -3 मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित केला आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे युवा पिढीला आकर्षित करण्याच्या आणि त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने देशभरात जुलै आणि ऑगस्ट 2024 या काळात हे यश साजरे केले जात आहे.
केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने उद्या नवी दिल्लीतल्या कृषी भवन येथे आयोजित राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उपस्थित राहणार आहेत. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल आणि जॉर्ज कुरियन, तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलाक्ष लिखी यावेळी उपस्थित राहतील.
चांद्रयान-3 मोहिमेचे उल्लेखनीय यश साजरे करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये “मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिकांची मालिका डॉ. अभिलाक्ष लिखी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करत आहे. मत्स्यव्यवसायात अंतराळ तंत्रज्ञान-आढावा, सागरी क्षेत्रासाठी संचार आणि दिशादर्शन प्रणाली,अंतराळ-आधारित निरीक्षण आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुधारणांवर त्याचा प्रभाव यांसारख्या विषयांवर ही चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके 18 ठिकाणी आयोजित केली जात आहेत.
अंतराळ विभाग, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि मच्छीमार, सागर मित्र, मत्स्यशेती उत्पादक संघटना, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, आयसीएआर मत्स्य संशोधन संस्था, राज्य/ केंद्रशासित प्रदेश मत्स्य विभाग, मत्स्यव्यवसाय महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी हायब्रीड पद्धतीने सहभागी होतील.
भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते, विशेषत: ग्रामीण भागात उदरनिर्वाह, रोजगार आणि आर्थिक संधी प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 8,118 किमी पसरलेली विस्तृत किनारपट्टी, 2.02 दशलक्ष चौरस किमीचे ईईझेड अर्थात आर्थिक स्वामित्व (सागरी) क्षेत्र आणि विपुल अंतर्गत जलस्रोतांसह, भारत एक समृद्ध आणि भरभराटीला येणारी मत्स्यव्यवसाय परिसंस्था आहे.
अंतराळ तंत्रज्ञान भारतीय सागरी मत्स्यपालन व्यवस्थापन आणि विकासाला लक्षणीय गती देऊ शकते. सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग अर्थात उपग्रह दूर संवेदन, पृथ्वी निरीक्षण, उपग्रह आधारित दिशादर्शन प्रणाली आणि जीआयएस, सॅटेलाइट कम्युनिकेशन, डेटा ॲनालिटिक्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादीसारख्या काही तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राचा कायापालट झाला आहे.