Connect with us

गोवा खबर

भारत ऊर्जा सप्ताह 2025 हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम : हरदीप सिंग पुरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारत ऊर्जा सप्ताह 2025 (आयईडब्ल्यू) हा 1 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर आयोजित कार्यक्रम, सहभाग, प्रदर्शन स्थळाची भव्यता आणि त्यातील सत्रांमुळे जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.

नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमीवर 11 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आयईडब्ल्यू 2025 मध्ये मंत्री, सीईओ आणि उद्योग धुरीण यांच्याकडून अतुलनीय जागतिक सहभागाचे आश्वासन देण्यात आले आहे, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात नवीन मापदंड  निर्माण होईल.

माध्यमांशी संवाद साधताना, मंत्र्यांनी आयईडब्ल्यू 2025 च्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या क्लीन कुकिंग मिनिस्टरियल  कार्यक्रमावर प्रकाश टाकला. हा कार्यक्रम स्वच्छ स्वयंपाक उपायांचा जागतिक स्तरावर स्वीकार वाढवण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना बळकटी देणारा एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करेल. भारताची अत्यंत यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) कार्यक्रमाचा गाभा असून ती ऊर्जा उपलब्धता आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक नमुना म्हणून मौल्यवान दृष्टिकोन आणि सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करेल.

आयईडब्ल्यू 2025 मध्ये मागील कार्यक्रमांच्या तुलनेत व्याप्ती आणि सहभागात उल्लेखनीय वाढ होईल. प्रदर्शनाची जागा 65% ने अधिक म्हणजे 28,000 चौरस मीटर असेल, तर परिषदेच्या सत्रांची संख्या 105 पर्यंत वाढेल आणि जागतिक प्रतिनिधींची संख्या 70,000 पेक्षा जास्त होईल. प्रमुख आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह 500 हून अधिक वक्ते यात सहभागी होतील जे कार्यक्रमाच्या वाढत्या जागतिक महत्वाचे द्योतक आहे. या परिषदेत अमेरिका, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी आणि नेदरलँड्स सारख्या आघाडीच्या 10 देशांची हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, जैवइंधन आणि पेट्रोकेमिकल्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आठ संकल्पनात्मक क्षेत्रातील दालने असतील.

या कार्यक्रमात 20 हून अधिक परराष्ट्र ऊर्जा मंत्री किंवा उपमंत्री, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि फॉर्च्यून 500 ऊर्जा कंपन्यांचे 90 सीईओ सहभागी होतील. हे जागतिक ऊर्जा संक्रमण विचारमंथनाला आकार देण्यात भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब आहे. आघाडीच्या आयआयटी, अविन्या आणि वसुधा सारख्या स्टार्टअप प्लॅटफॉर्मसह तरुणांना आणि नवोन्मेषकांना सहभागी करण्याच्या उपक्रमांवर पुरी यांनी प्रकाश टाकला; आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञान-चालित उपाय प्रदर्शित करण्यासाठी दिल्ली/एनसीआर मधील 500 विद्यार्थी सहभागी होतील असे सांगितले.