Connect with us

गोवा खबर

गोव्याने पश्चिम आणि मध्य राज्य/केंद्रशासित प्रदेश पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेत पुनर्संचयित आणि शाश्वत पर्यटनासाठी स्थापित केले मापदंड

Published

on

Spread the love
गोवा खबर : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ताज सिदादी गोवा होरायझन येथे आयोजित केलेल्या पश्चिम आणि मध्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेत गोवा पर्यटन विभागास सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.
या बैठकीत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री सुरेश गोपी, केंद्रीय पर्यटन सचिव व्ही. विद्यावती, आयएएस, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री दिया कुमारी, मध्य प्रदेशचे पर्यटन मंत्री धर्मेंद्र भावसिंह लोधी, छत्तीसगडचे पर्यटनमंत्री केदार कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील इतर अधिकाऱ्यांसह उपस्थित मंत्र्यांनी संपूर्ण प्रदेशातील पर्यटनाला गती देण्यासाठी सहयोगी धोरणांवर चर्चा केली.

पर्यटनमंत्री खंवटे यांच्यासह पर्यटन संचालक सुनील अंचिपाका, आयएएस यांनी या मेळाव्यात राज्याचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय पर्यटन वाढविण्यासाठी सहयोग वृद्धिंगत करत असताना खंवटे यांनी गोव्याला शाश्वत आणि पुनर्संचयित पर्यटनात अग्रेसर बनवण्याचा त्यांचा दूरदर्शी आराखडा सांगितला. अस्सल गोव्याची शिष्टमंडळाची ओळख करून देणारा व्हिडिओ त्यांनी सादर केला.
गजेंद्रसिंह शेखावत यांनी पर्यटनाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर आणि उद्योगातील लक्षणीय वाढ यावर भर दिला. ते म्हणाले, स्थानिक खाद्यपदार्थ, इमर्सिव्ह वॉक आणि तीर्थक्षेत्रे, अनोखे अनुभवात्मक पर्यटन यासारख्या नवीन मार्गांद्वारे आपण आपल्या पर्यटन क्षेत्रास समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या घटकांना आत्मसात करून आणि एकमेकांच्या सामर्थ्य आणि पद्धतींपासून शिकून, आम्ही आमच्या पर्यटन उद्योगाला आणखी उन्नत करू शकतो आणि अधिक जोडलेल्या, जागतिक समुदायाला प्रोत्साहन देऊ शकतो.
सुरेश गोपी यांनीही परिषदेत मनोगत व्यक्त केले. याव्यतिरिक्त इतर राज्यांतील मंत्री आणि सचिव/संचालकांनी आपापल्या प्रदेशातील पर्यटन संदर्भात सादरीकरण केले.
शाश्वत आणि पुनर्संचयित पर्यटनाला मध्यवर्ती ठेवत गोवा हे भारतातील शाश्वत आणि पुनर्संचयित पर्यटनाचे प्रारूप बनणार आहे. पर्यटनमंत्री खंवटे यांनी हरित पर्यटन पद्धती, सांस्कृतिक जतन आणि पर्यटक आणि स्थानिक दोघांनाही लाभ देणारे समुदाय-चालित उपक्रम यासाठी राज्याच्या वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी नमूद केले की अलीकडील जी-२० (G-20) मधील चर्चेने भविष्यासाठी शाश्वत आराखडा तयार करण्यात राज्याला मदत झाली आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील गंतव्यस्थान म्हणून आपल्या लौकिकाच्या पलीकडे जात गोव्याचे उद्दिष्ट आहे. आरामदायी मुक्काम आणि वेलनेस रिट्रीटपासून ते साहसी क्रियाकलाप, सांस्कृतिक पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यापासून दूर असणाऱ्या प्रदेशांचा (Hinterland) शोध घेण्यापर्यंत अनुभवांची विस्तृत श्रेणी देणे. भगवान परशुराम स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय यासारख्या भविष्यातील प्रकल्पांचा परिचय गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो, ज्यामुळे ते वर्षभराचे गंतव्यस्थान बनते.
एकसंध पर्यटन धोरण तयार करण्यासाठी गोव्याच्या व्हिजनमध्ये इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंध मजबूत करणे समाविष्ट आहे. सर्वोत्कृष्ट पद्धती, संसाधने आणि डेटा सामायिक करून भारताचा एकूण पर्यटन अनुभव वाढवणे आणि विविध पर्यटन सेवांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थान देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. मंत्र्यांनी पंचतारांकित वेडिंग डेस्टिनेशन हॉटेल आणि आग्वाद किल्ला या प्रतिष्ठित स्थळांच्या व्यवस्थापनासारख्या प्रकल्पांसह नवीन उपक्रमांवर चर्चा केली. या उपक्रमांचे उद्दिष्ट गुंतवणूक आकर्षित करणे, नवनिर्मितीला चालना देणे आणि गोव्यातील पर्यटन पायाभूत सुविधांची गुणवत्ता वाढवणे आहे.
गोव्याने गेल्या दोन वर्षांत एकूण १२ प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात टुडेज ट्रॅव्हलर अवॉर्ड्स, पाटवा पुरस्कार, पुनर्संचयित पर्यटनासाठी मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट अवॉर्ड, ईटी ट्रॅव्हल अवॉर्ड्स आणि राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार यांचा समावेश आहे. या यशांमुळे गोव्याचा दर्जा विविध पर्यटन अनुभवांसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून अधोरेखित होतो.
गोवा पर्यटन विकासासाठी उच्च मापदंड प्रस्थापित करत आहे. सतत नावीन्य आणि गुणवत्ता वाढीसाठी वचनबद्ध आहे. मंत्र्यांनी भविष्यातील आकर्षण, जसे की गोव्याचे भगवान परशुराम आयकॉनिक स्मारक (धनुष्य आणि बाणाच्या रूपात संरचित) आणि छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय, साहसी पर्यटनासाठी नवीन आकर्षण म्हणून जागतिक दर्जाच्या मत्स्यालयाची योजना दर्शविणारा ३डी व्हिडिओ सादर केला.
इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत गोवा पर्यटन विभाग सहयोगी दृष्टीकोन वाढवण्याच्या आपल्या समर्पणाची पुष्टी केली, शाश्वत पद्धतींचा पुरस्कार करताना भारतातील एकूण पर्यटन अनुभव वाढवला. गोवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन मंचांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, बाजारपेठेतील उपस्थिती वाढवणे आणि सर्व अभ्यागतांसाठी वृद्धी आणि सुरक्षितता सुनिश्चित करणारी नावीन्यपूर्ण भागीदारी करणे सुरू ठेवेल.