- वाळपईत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात
गोवा खबर : भारत स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता राष्ट्र प्रथम ही भावना त्यांच्या मनामध्ये होती व त्या अनुषंगाने त्यांनी कार्य केले. म्हणून आपण आज स्वातंत्र्याची मधुर फळे चाखत आहोत. ही राष्ट्र प्रथम ही भावना आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचे आहे. लहान मुलांच्या हृदयात ही भावना उत्पन्न झाली पाहिजे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी केले.
वाळपईतील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राणे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील २०४७चा भारत साकारण्यासाठी प्रत्येक सामान्य भारतीय नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मुलांनी व युवांनी उच्चशिक्षण घेतले पाहिजे. आपण साक्षर व सुशिक्षित, संस्कृत होणे गरजेचे आहे. मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रात बदल घडून आलेले आहेत. जनधन योजना, लाडली लक्ष्मी, डिजिटल पेमेंट, इत्यादी आमूलाग्र बदल घडले आहेत व हे विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार
यावर्षी सत्तरी तालुक्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्राची हानी झालेली आहे. पण येणाऱ्या कालावधीत सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार आहे. दीनदुबळ्ळ्या गरीब जनतेने व शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सरकार सदैव त्यांच्यासोबत आहे. विविध योजनांचे पैसे आता थेट खात्यामध्ये जमा होत आहेत. शेतकरी आधार निधी, किसान सन्मान निधी, लाडली लक्ष्मी यांसारख्या विविध योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होतात, असे त्या म्हणाल्या.