Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वच्छ भारताच्या स्वप्नानं जन आंदोलनाचं रूप घेतलं आहे :कौशल किशोर

Published

on

Spread the love



केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून स्वच्छता स्टार्टअप आव्हान मोहिमेतल्या विजेत्यांचा (निवड झालेल्या स्टार्टअप्स चा) सन्मान

 

गोवा खबर:नवी दिल्ली इथे काल आयोजित पुरस्कार  सोहळ्यात, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विभागानं स्वच्छता स्टार्टअप आव्हान मोहिमेतल्या विजेत्यांचा (निवड झालेल्या स्टार्टअप्स चा) सन्मान केला. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री  कौशल किशोर, भारतातले फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लिनेन, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विभागाचे सचिव मनोज जोशी, आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी, या कार्यक्रमाला उपस्थित होते.

स्वच्छ भारताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं स्वप्न, आज नागरी स्वच्छ भारत अभियानाच्या (स्वच्छ भारत मिशन-अर्बन, SBM) आरंभासह जनआंदोलनात परिवर्तित झालं आहे असं कौशल किशोर यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. या मोहिमे अंतर्गत कचऱ्यावर  पुनर्प्रक्रिया करून  उपयुक्त उत्पादन घेण्यामुळे,  कचरामुक्त शहरांच्या दिशेनं वाटचाल तर होईलच, सोबत  मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला सुद्धा मदत होईल असं त्यांनी सांगितलं.‌

स्वच्छता स्टार्टअप आव्हान मोहिमे अंतर्गत अंतिम निवड यादीत समाविष्ट झालेल्या 30 पैकी, निवड झालेल्या विजेत्या पहिल्या 10 स्टार्ट अप्सना, फ्रान्स सरकारनं स्टार्टअप्सना  उत्तेजन देण्याकरता सुरू केलेल्या फ्रेंच टेक या उपक्रमातून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल. उर्वरित 20 स्टार्ट अप्सना केंद्र सरकारकडून 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल असं किशोर यांनी जाहीर केलं.

कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादनांच्या  विपणनाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितलं की या उत्पादनांचं विपणन आणि त्याबाबत जनजागृती या बाबी स्टार्ट अप्स च्या विस्तारासाठी महत्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागात आपापल्या उत्पादनांची माहिती देणारा प्रचार आणि प्रसार, तिथल्या स्थानिक भाषेत करावा असा सल्लाही किशोर यांनी  स्टार्टअप्सना यावेळी दिला.