Connect with us

गोवा खबर

22 पदके, 10वे स्थान: आमचे पॅरा-अ‍ॅथलीट्स नव-भारताच्या भावनेचे प्रतीक आहेत: डॉ. मनसुख मांडविया

Published

on

Spread the love


ही पदके केवळ एक धातू नव्हे तर तुमच्या अढळ इच्छाशक्तीचे प्रमाण आहे: डॉ. मांडवीय

2025च्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक पदके मिळविल्यानंतर भारताच्या पॅरा अ‍ॅथलीट्सचा केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केला सत्कार

 

 

गोवा खबर:केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली मध्ये 2025  च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पदक विजेत्या पथकाचा सत्कार केला आणि देशासाठी अभिमानास्पद त्यांच्या असाधारण उत्साह, दृढनिश्चय आणि विक्रमी कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.

जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या  इतिहासातील भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  एकूण 22 पदकांसह 10 वे स्थान पटकावले असून त्यात – 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाने पॅरा अ‍ॅथलीट्सना 1.09 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख बक्षिसे दिली.

   

“तुम्ही केवळ पॅरा नव्हे  तर भारताचे पॉवर खेळाडू आहात. पदक जिंकल्यानंतर तुम्ही देशाला दिलेला गौरव  आणि विशेषतः दिव्यांग लोकांना तुम्ही दिलेला प्रेरणादायी संदेश उल्लेखनीय आहे. तुम्ही दाखवलेला उत्साह प्रचंड आहे,” असे डॉ. मनसुख मांडविया यांनी सत्कारादरम्यान या  खेळाडूंना संबोधित करताना सांगितले. ” पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांचे  नव- भारताचे स्वप्न आणि भावना तुम्ही उत्तम प्रकारे कायम राखल्या आहे.”

जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित नवी दिल्ली 2025 जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा ही भारतात आयोजित केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरा-क्रीडा स्पर्धा होती, ज्यामध्ये 100 देशांतील 2,100 हून अधिक सहभागींनी 186 पदक स्पर्धांमध्ये भाग घेतला.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) चे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया म्हणाले, “क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) यांनी आम्हाला एका कुटुंबाप्रमाणे मदत केली आहे.

    

जेएलएन स्टेडियममध्ये खेळाडूंनी मोंडो ट्रॅकच्या बाजूने एकमुखाने मत व्यक्त केले. या ट्रॅकने चॅम्पियनशिप दरम्यान मोठी भूमिका बजावली. 2025 च्या डब्ल्यूपीएसीमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारा शैलेश कुमार म्हणाला, “भारतात हा खूप मोठा कार्यक्रम होता. मी पहिल्या दिवशी घाबरलो होतो पण तयारी चांगली होती.”

दुहेरी पदक विजेती प्रीती पाल यांनी वैद्यकीय केंद्राचा उल्लेख केला. “आमच्या शर्यतींदरम्यान वैद्यकीय कक्षाने आम्हा धावपटूंना बरे होण्यासाठी खूप मदत केली. विशेषतः बर्फाचे स्नान खरोखर फायदेशीर ठरले,” असे ती म्हणाली.

पॅरा खेळाडूंनी दाखवलेल्या मानसिक निर्धाराचा  पुनरुच्चार करताना, डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘अपंगत्वाचे दृढनिश्चयामध्ये’ रूपांतर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. “ही धाडसाची एक नवीन व्याख्या आहे जी भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. संपूर्ण देशाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. तुम्ही केवळ पदके जिंकली नाहीत तर तुम्ही आमची मनेही जिंकली आहेत.” “तुम्ही दाखवून दिले आहे की जेव्हा निर्धार मजबूत असतो तेव्हा व्हीलचेअर देखील पंख बनू शकते ,” असे ते पुढे म्हणाले.