गोवा खबर:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा महिन्यांत तीन वेळ गोव्यात आले. परंतु, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेसचे मोठे नेते गोव्यात येणार अशा बाता प्रदेशाध्यक्षांनी मारूनही काँग्रेसचा एकही बडा नेता गोव्यात आलेला नाही. राहुल गांधी, प्रियांका वाड्रा किंवा मल्लिकार्जुन खर्गेसारख्या नेत्यांना गोव्यात येण्याची धमक नाही की त्यांना हरण्याची भीती वाटते, असा प्रश्न भाजपाचे प्रवक्ते श्री. गिरिराज पै वैर्णेकर यांनी काँग्रेसला विचारला आहे.
देशाचे लोकप्रिय नेते असलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी गोव्यात येऊन येथील प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना मात्र गोव्याला महत्त्व दिले नाही. भारत जोडो यात्रा आज येणार, उद्या येणार अशी खोटी आश्वासने देऊनही यात्रा गोव्याकडे फिरकली नाही. काँग्रेसला गोव्याचे सोयरसुतक नाही असेच यातून दिसून येत आहे. जनतेने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे याविषयी स्पष्टीकरण मागितले पाहिजे, असे श्री. गिरिराज पै वेर्णेकर यांनी सांगितले.
सध्याची निवडणूक ही देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे. भाजपाकडे श्री. नरेंद्र मोदी यांच्यासारखा यशस्वी नेता आहे. इंडिया आघाडीकडे नेतृत्वच नाही. आलटून पालटून पंतप्रधानपद वाटून घेतले जाईल, असे आघाडीचे नेते सांगत आहे. अशा स्थितीत मतदारांनी काँग्रेसला नाकारून उत्तर आणि दक्षिणेतून भाजपाच्या उमेदवारांना विजयी करावे, आणि केंद्रात श्री. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन श्री. गिरिराज पै वेर्णेकर यांनी केले.