माहिती हक्क दिवस साजरा
गोवा खबर:गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्याने गोवा राज्य माहिती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने पणजी मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित माहिती हक्क कायदा दिवस साजरा केला. देशात माहिती हक्क कायद्याची २००५ पासून अंमलबजावणी झाल्यापासून हा दिवस साजरा केला जातो. सरकारी खाते/महामंडळे आणि स्वायत्त संस्थांचे प्रथम अपील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी गोवा राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री अरविंद कुमार एच. नायर आणि राज्य माहिती आयुक्त ॲड आत्माराम आर बर्वे यांच्या उपस्थितीत केले.
ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ‘आरटीआय कायद्याची भावना कायम ठेवण्यासाठी प्रथम अपील अधिकाऱणीची भूमिका’ या विषयावर विशेष व्याख्यान देताना माहिती हक्क कायदा हा भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत आहे आणि माहिती हक्क हाही मुक्त आणि सुसंस्कृत समाजातील प्रत्येक व्यक्तींचा नैसर्गिक अधिकार आहे असे सांगितले. माहिती हक्क कायद्याचा भारतीय संविधानात समावेश आहे आणि लोकशाही समाजात माहिती हक्क हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे, असे त्यांनी सांगितले. माहिती हक्क कायद्याचा इतिहास आणि उद्देश जाणून घेणे महत्वाचे आहे आणि कायद्यातील नियमाप्रमाणे अर्जदारास माहिती देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सरकारी धोरणे आणि योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचणे तसेच सरकारी प्रशासनात पारदर्शकता यावी आणि सरकारच्या कारभाराविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी अर्जदारास या कायद्याखाली मागितलेली माहिती अचूक आणि वेळेत देणे ही जन माहिती अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असेही पांगम यांनी सांगितले
मांहिती हक्क कायद्यात पहिल्या अपेलेट अधिकाऱ्यास अधिक अधिकार दिले नाही तरी त्यांनी आपली जबाबदारी ओळखून अर्जदारास माहिती देण्यास जन माहिती अधिकाऱ्यास आदेश दिला पाहिजे आणि गरज पडल्यास राज्य माहिती आयोगाकडून सल्ला घेतला पाहिजे. अर्जदारास कांही अपवादात्मक कारणांसाठी माहिती नाकारता येते, परंतु जी माहिती विधानसभेच्या मंचावर मांडतात ती माहिती सार्वजनिक असते आणि तशी माहिती देण्यास कोणतीही हरकत नाही. तसेच अशी माहिती सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध केल्यास लोकांना माहिती मिळविण्यासाठी अर्ज करण्याची गरज पडणार नाही आणि माहिती अधिकाऱ्यांचे काम कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

गोवा राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री अरविंद कुमार एच. नायर यांनी आरटीआय कायद्याच्या प्रस्तावनेचा पुनरुच्चार करताना लोकशाहीला सुजाण नागरिक आणि माहितीची पारदर्शकता आवश्यक आहे जी त्याच्या कामकाजासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आवश्यक आहे असे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील आव्हाने सांगितली . आरटीआय कायद्याची अंमलबाजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जन माहिती अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याकडे तत्परता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले.
सुरवातीस आपल्या स्वागतपर भाषणात राज्य माहिती आयुक्त ॲड आत्माराम आर बर्वे यांनी लोकांना माहिती हक्क कायद्याचे ज्ञान आणि उद्देश कळण्यासाठी या कायद्या संबंधी माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध करण्याची गरज व्यक्त केली, जेणे करून लोकांना या कायद्याचे महत्व समजेल, असे सांगितले. हा कायदा पारदर्शकता आणि तत्परतेस प्रधान्य दिते, असेही त्यांनी सांगितले.
माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री.दिपक बांदेकर यांनी आभार मानून ॲड देविदास पांगम यांनी सखोल व अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात आणि समन्वय केल्याबद्दल त्यांनी राज्य माहिती आयुक्त आणि राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे आभार मानले. श्री बांदेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरटीआय ऑनलाइन पोर्टल सुरू केल्याची माहिती दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेशानुसार नोंदणी करण्यास सांगितले.
यावेळी गोवा राज्य माहिती आयोगाचे सचिव श्री. सुधीर केरकर उपस्थित होते. सहायक माहिती अधिकारी श्री श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले.