गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. टाटा हे एक दूरदर्शी उद्योजक, दयाळू मन असलेले एक असाधारण व्यक्तिमत्व होते. आपल्या विनम्र, दयाळू स्वभावाने आणि आपला समाज अधिक चांगला बनवण्याप्रति अतूट बांधिलकीने त्यांनी अनेकांना आपलेसे केले, अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एक्स वरील थ्रेड पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिले, “रतन टाटा जी एक दूरदर्शी उद्योजक, दयाळू मन असलेले एक असाधारण व्यक्तिमत्व होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित उद्योग समूहाला त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. आणि हे करताना, त्यांनी दिलेले योगदान बोर्डरूमच्या पलिकडचे होते. नम्रता, दयाळूपणा आणि आपला समाज अधिक चांगला कसा बनेल याप्रति अतूट बांधिलकीने त्यांनी अनेकांना आपलेसे केले.

“रतन टाटाजींच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे भव्य स्वप्ने पाहण्याची आवड आणि समाजाला परत देण्याची त्यांची तळमळ विलक्षण होती. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कार्यांमध्ये मदतीसाठी ते नेहमीच आघाडीवर असायचे.”
“रतन टाटा जी यांच्याशी अनेकदा झालेल्या संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध विषयांवर चर्चा करायचो. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो त्यानंतरही हा संवाद सुरूच राहिला. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि प्रशंसकांप्रति माझ्या सहवेदना. ओम शांती.”