गोवा खबर : भारत आणि अमेरिका एकत्रितपणे भक्कम शक्ती आहे जी जगात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य सुनिश्चित करू शकते, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
22 रोजी वॉशिंग्टन येथे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचल्यानंतर तेथील भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे नैसर्गिक सहयोगी आहेत त्यामुळे ते मजबूत भागीदार होणे साहजिक असून हे सहकार्य सतत वृद्धिंगत होत आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चैतन्यपूर्ण नेतृत्वाखाली भारताचा लौकिक जागतिक स्तरावर वाढला आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सध्याचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी होत असलेली 600 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात आता 21,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली. या भेटीमुळे भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ आणि व्यापक होईल अशी अपेक्षा आहे.