गोवा खबर : समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज केपे क्रीडा संकुलात ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रीय तिरंगा फडकविला.
फळदेसाई यांनी भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि ६५% लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे, सर्वात उत्पादनक्षम वय आणि आम्ही भारताला तरुण राष्ट्र म्हणतो असे सांगितले. भारताची लोकशाही, भारताची परंपरा आणि मूल्ये या तरुणांच्या खांद्यावर आहे, असे ते म्हणाले. आपल्याकडे क्षमता, बुद्धिमत्ता, कौशल्य, प्रतिभा आणि ज्ञान असून या राष्ट्राला जगातील सर्वात मोठी, शक्तिशाली आणि महासत्ता बनविण्यासाठी आपण या गुणांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
फळदेसाई यांनी आपण महान देशाचे नागरिक आहोत असे सांगितले. हर घर तिरंगा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आवाहनामुळे अभिमान आणि स्वाभिमान जागृत झाला आहे असे ते म्हणाले.

राष्ट्र उभारणीसाठी आणि गोव्याला आदर्श राज्याच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पूर्ण होत असताना आता ही चळवळ शतक पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे लक्षात घेऊन दिव्य पाऊल टाकणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे ते म्हणाले. भारत हा प्रदीर्घ इतिहास आणि महान परंपरा असलेला सर्वात जुना देश आहे असे फळदेसाई म्हणाले.
मंत्र्यांचे आगमन होताच केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर आणि पोलीस उपअधिक्षक निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.
मंत्र्यांनी पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश नाईक, दिनेश गावकर, कृष्णदीप बोरकर आणि श्रीमती जॉयसी कार्व्हालो यांच्या नेतृत्वाखालील पोलीस तुकडीने दिलेली मानवंदना स्वीकारली. फळदेसाई यांनी पोलीस संचलनाची पाहणी केली. विद्यार्थी पथकही यावेळी उपस्थित होते. केपे तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता गीते सादर केली.
माजी मंत्री डॉमिनिक फर्नांडिस, केपेचे मामलेदार नाथन आफोंसो, केपेचे पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. कुडचडे चंद्रभागा तुकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार कोपरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.