गोवा खबर : राजभवन येथील वामन वृक्ष कला उद्यान (बोन्साय गार्डन) हे भारतातील सरकारी आस्थापने तसेच प्रशासकीय संस्थांमधील सर्वात मोठे बोन्साय उद्यान ठरले आहे.
राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राजभवनात आचार्य चरक (आयुर्वेदाचे जनक) आणि आचार्य सुश्रुत (शस्त्रक्रियेचे जनक) यांच्या पुतळ्यांच्या स्थापनेच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच राजभवन कॅम्पसमधील नूतनीकरण केलेल्या जलतरण तलाव आणि कपडे बदलण्याच्या खोलीचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यपालांच्या मदत निधीतून कर्करोग रुग्णांना 40 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल पिल्लई यांनी आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रातील आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांच्या योगदानाचे उदाहरण देत ते प्राचीन भारतीय आरोग्यसेवा प्रणालीतील आदरणीय व्यक्तिमत्त्वे असल्याचे सांगितले.
आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आपल्या परंपरेवर आधारित देशाचे पुनरुत्थान आणि त्या प्रक्रियेत गोव्याच्या इतिहासात प्रथमच हे पुतळे बसवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आचार्य सुश्रुत हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध वैद्य होते. सुश्रुत संहिता हे सर्वात प्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे आणि चरक संहितेसह भारतातील वैद्यकीय परंपरेतील मूलभूत शास्त्रांपैकी एक आहे. मेलबर्न येथील प्रख्यात रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ सर्जनमध्ये सुश्रुत आचार्यांची मूर्ती प्रदर्शनात असल्याची माहितीही राज्यपालांनी दिली.
वामन वृक्ष कला उद्यान (बोन्साय गार्डन) विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असेल. या बागेकडे पाहून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि विविध प्रकारची बोन्साय रोपे विद्यार्थ्यांना संशोधनावर आधारित अभ्यास करण्यास मदत करतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तरुणांना त्यांच्या संशोधनात्मक अभ्यासावर आधारित पुस्तके लिहिण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांची मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले असून ते ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यपालांचे सचिव एमआरएम राव, आयएएस यांनी स्वागत केले आणि राजभवनाचे विशेष अधिकारी मिहीर वर्धन यांनी संकल्पना मांडली. गोव्याच्या प्रथम महिला रिता पिल्लई यांनीही यावेळी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमाला माजी खासदार व पत्रकार बलबीर पुंज, उत्तर जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, राज्यपालांचे सचिव संजीव गावस देसाई उपस्थित होते. श्रेया गुरव यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश वायंगणकर यांनी आभार मानले.