गोवा खबर:स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर (घरोघरी) तिरंगा’ अभियाना अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय, 11 युनिटने आज सायकल रॅली काढली. डिआयजी अरुणाभ बोस यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. मुख्यालयापासून वारका समुद्र किनाऱ्यापर्यंत निघालेल्या रॅलीत अधिकारी आणि संरक्षण दलातील कर्मचारी असे 75 जण सहभागी झाले होते.
सायकल रॅलीच्या मार्गावर सायकलपटूंनी स्थानिकांना ‘हर घर (घरोघरी) तिरंगा’ मोहिमेविषयी सांगत 13-15 ऑगस्ट दरम्यान घरावर तिरंगा फडकावण्याविषयी माहिती दिली. तसेच स्थानिक मच्छीमार समुदायाला समुद्रात मासेमारीदरम्यान घ्यावयाची सुरक्षितता, सागरी परिसर स्वच्छतेचे आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले आणि प्लास्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर (घरोघरी) तिरंगा’ अभियानांतर्गत गोवा तटरक्षक दलाकडून चिखली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आणि गोवा क्रांतीचे जनक टी बी कुन्हा यांच्या वास्को येथील पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावला जाणार आहे. तसेच तटरक्षक दल मुख्यालय परिसरात वृक्षारोपण आणि कार्यालयीन आणि निवासी इमारतीला तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.