‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत विविधांगी कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन
गोवा खबर:देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा भाजपाच्या विविध मोर्चांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गोवा भाजपच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित मोर्चा, किसान मोर्चा यांच्यासह एकूण आठ मोर्चांच्यावतीने राज्यात विविध उपक्रम आणि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती पक्षाच्यावतीने आज देण्यात आली.
पक्षाच्या येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस वासुदेव मेंग गावकर, भारती बांदेकर, सिद्धेश पेडणेकर, अँथनी बार्बोज आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेनील आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मोर्चांनी कंबर कसली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
सर्व मोर्चाच्यावतीने विविध उपक्रम आणि कार्यकम्र राबविण्यात येणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांनी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज्यातील सर्व घरे, दुकाने, आस्थापने, बँका, सहकारी संस्था, शेतकरी संस्था, शेतकरी बांधव आदींनी तिरंगा लावावा, असे आवान किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर यांनी केले. तर युवा मोर्चाच्यावतीने राज्यातील ३६ मतदारसंघात तिरंगा रॅली काढणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक मतदारसंघात ६ हजारपेक्षा अधिक तिरंगा झेड्यांचे वाटप करण्यात येणार असून राज्यातील चार ठिकाणी लोकांसाठी विनामुल्य तिरंगा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार यशस्वी करण्यासाठी राज्यातील स्वयंसाहाय्य गट, महिला लघुउद्योजकांनी पुढे यावे असे आवाहन भारती बांदेकर यांनी केले. महिला मोर्चाच्यावतीने या दरम्यान स्तन कर्करोग चाचणी शिबिर तसेच बुस्टर डोस घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
गेल्या महिन्यात पाटणा-बिहार येथे झालेल्या देशातील सर्व मोर्चांच्या परिषदेची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या परिषदेला देशाचे गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पी. एल. संतोष अशा अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. संपूर्ण राज्य तिरंगामय करण्याचे ठरविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.