गोवा खबर : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटांना केवळ हवामानातील बदल म्हणून न पाहता ती एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सजग राहून आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
उष्णतेच्या लाटांचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच फ्रंटलाइन कामगारांवर अधिक होतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे राणे यांनी नमूद केले.
नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळणे, तसेच साध्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे गरजेचे आहे. “प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तातडीने संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले. राज्यातील आरोग्य व्यवस्था सज्ज असून सर्वांना सेवा देण्यासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन परिस्थितीत 108 Emergency Response Service या मोफत रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही सेवा २४ तास कार्यरत असून गरजूंना त्वरित मदत मिळण्यासाठी सक्षम आहे.
“काही क्षणांची जागरूकता आणि तत्काळ प्रतिसाद एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. नागरिकांची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असून त्यांच्या आरोग्याची आम्ही बांधिलकी घेतली आहे,” असे ठामपणे राणे यांनी सांगितले.