Connect with us

Uncategorized

आयएएस प्रशिक्षणार्थींची आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा येथे भेट; शाश्वत किनारी कृषीविषयी घेतली माहिती

Published

on

Spread the love

गोवा खबर:लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, भारत सरकार येथील 2025 च्या बॅचमधील अकरा आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या पथकाने त्यांच्या हिवाळी अध्ययन दौर्‍याचा भाग म्हणून आज आयसीएआर–केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था येथे भेट दिली.

संस्थेचे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी प्रशिक्षणार्थींचे स्वागत केले. त्यांनी भारतीय कृषीच्या गौरवशाली प्रवासाविषयी माहिती देत भारतीय कृषी संशोधन परिषद प्रणाली आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षेमधील तिच्या योगदानाबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. आर. सोलोमन राजकुमार यांनी संस्थेच्या कार्यक्षेत्र आणि संशोधन उपक्रमांवर सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी शाश्वत किनारी कृषी, हवामान-लवचिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन यांवर विशेष भर दिला. तसेच, शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती आणि किनारी शेतकऱ्यांच्या उपजीविकेत सुधारणा करण्यासाठी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अभिनव संशोधन प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

यावेळी प्रशिक्षणार्थींनी संस्थेतील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. पिकांवरील कीड व्यवस्थापन, क्षारता (सॅलिनिटी) प्रवेश, समुद्री शेवाळ (सीवीड) उपयोग तसेच कृषी क्षेत्रात तरुणांना टिकवून ठेवण्यासाठी अ‍ॅग्रो-इकोटुरिझमसारख्या अभिनव संकल्पनांवर चर्चा करण्यात आली. या विषयांना वैज्ञानिक नवकल्पना आणि धोरणात्मक हस्तक्षेपांचा आधार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयन डॉ. विनोद उबरहंडे यांनी केले. तसेच श्री. राहुल कुलकर्णी आणि सौ. प्रांजली वाडेकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

या भेटीमुळे प्रशिक्षणार्थींना किनारी भागांसाठी उपयुक्त अशा अनुप्रयुक्त कृषी संशोधन आणि शाश्वत विकासाबाबत मौल्यवान अनुभव व माहिती प्राप्त झाली.