गोवा खबर : सध्या सर्वत्र हिंदू बहिणींवर ‘लव्ह जिहाद’ आणि जबरदस्ती धर्मांतराच्या स्वरूपात भीषण सामाजिक आपत्ती ओढवलेली आहे. देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड यांसारख्या ११ राज्यांनी ‘लव्ह जिहादविरोधी’ किंवा ‘धर्मांतरबंदी’ कायदे आधीच लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर बहिणीच्या रक्षणासाठी गोव्यातही तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळामध्ये हेमश्री गडेकर आणि राजश्री गडेकर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांचीही उपस्थिती होती. गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्याची मागणी असलेल्या या निवेदनावर ७ सहस्त्र गोमंतकीय नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात गोव्यात घडलेल्या विविध ‘लव्ह जिहाद’ घटनांचा उल्लेख केलेला आहे. या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. साक्षी, अनुराधा, श्रद्धा यांसह अन्य हिंदू मुलींची हत्या करणार्या लव्ह जिहादींना तत्काळ फासावर लटकवावे. राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना याची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी.
यावेळी ‘रणरागिणी’च्या वतीने आमदार दाजी साळकर, आमदार उल्हास तुयेकर, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. देवीया राणे यांनाही हे निवेदन देण्यात आले. ‘रणरागिणी’ने गोव्यात गेले काही महिने लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संघटना, महिला स्वयंसाहाय्य गट आदींच्य गाठीभेटी घेऊन ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्यासाठी गाठीभेटी घेणे, महिला मेळाव्यांचे आयोजन करणे आदींच्या माध्यमांतून जनजागृती आरंभली आहे.