-
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती : आयोगाकडून ५० जणांना नियुक्तिपत्रे
गोवा खबर : मूळ गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी, यासाठी कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत ‘कोकणी’ विषय अनिवार्य केला आहे. १५ वर्षांचा निवासी दाखला असला तरी कोकणी उत्तीर्ण न झाल्यास नोकरी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सावंत यांनी विविध खात्यांमध्ये भरती झालेल्या ५० उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली. कार्यक्रमाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कर्मचारी निवड आयोगामुळे भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आली आहे. उमेदवारांना आता ऑनलाइन परीक्षा देऊन काही तासांतच निकाल मिळतो, जे पूर्वी शक्य नव्हते.
यावेळी ‘स्वयंपूर्ण गोवा’ या उपक्रमातील यशोगाथांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. मुख्यमंत्री सावंत यांनी उमेदवारांना पुढील ३० वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून राज्याच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.