-
चित्रपटाचे नाव बदलावे : हिंदू जनजागृती समितीची मागणी
गोवा खबर : समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. हा समर्थ रामदासस्वामींचा अपमानच आहे. उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. संतपरंपरेचा हा अपमान आहे. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन “मनाचे श्लोक” हे पवित्र नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केली आहे.
सोलंकी म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? आणि जरी केले, तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात? यापूर्वी ‘द डा विंची कोड’ आणि ‘विश्वरूपम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या. केंद्र आणि राज्य शासनाने भविष्यात अशा प्रकारे धार्मिक प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा.