गोवा खबर : दसरा, दिवाळी आदि सणांच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणार्या भेसळीवर आळा घालावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सुराज अभियाना’ने अन्न आणि औषध प्रशसनाच्या संचालिका श्वेता देसाई आणि उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी ‘सुराज अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये ‘सुराज अभियान’चे समन्वयक सुचेंद्र अग्नी आणि अधिवक्ता रुपेश गावस यांची उपस्थिती होती.

‘सुराज अभियान’ निवेदनाद्वारे ‘‘दसरा, दिवाळी आदी सणांच्या वेळेला पेढा, बर्फी, गुलाब जामून आदी गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. या सर्व गोडपदार्थ बनवण्यासाठी मावा किंवा खवा यांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
वाढत्या मागणीमुळे खव्यामध्ये अनेक ठिकाणी भेसळ केली जाते आणि यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असते. यावर आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने गोड पदार्थ बनवणार्या दुकानांवर आकस्मिक धाडी घालाव्याआणि तेथील खवा चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा. भेसळ होत असल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करावी. भेसळीविषयी व्यापक जनजागृती करावी. मार्केट परिसरात ठिकठिकाणी गोड पदार्थ तपासणी केंद्रे उभारावीत’’ अशी मागणी केली आहे.