Published
12 months agoon
गोवा खबर : प्रत्येक जुलैमध्ये लाखो भक्त महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या भागांतून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी साठी निघतात. गोव्यातील व्यावसायिका, फिटनेसप्रेमी आणि CII-IWN च्या माजी अध्यक्षा शीतल पै काणे यावर्षी पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी झाल्या. त्यांनी सहा दिवसांत 210 किलोमीटरचा पाय दुखवणारा पण मन प्रसन्न करणारा प्रवास पूर्ण केला.
पावसाच्या सरी, डोक्यावर तुळशी वृंदावन, पायांखाली मातीचा गंध, आणि ओठांवर ‘माऊली’चा गजर… शीतल पै काणे यांचं पंढरपूर वारीतलं पाऊल एक वेगळंच व्रत बनलं. वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, ती एक अनुभूती आहे, नतमस्तक होऊन चालणाऱ्या हजारो भक्तांच्या सागरात स्वतःला वाहून देण्याची. आणि या वर्षी, शीतलसाठी ही अनुभूती अधिक खास ठरली, गोव्यातून आलेल्या तिच्या या वारीचा प्रवास केवळ तिचा नव्हता, तर प्रत्येक त्या गोमंतकीय भक्ताचा होता, जो मनात वारकऱ्यांसोबत त्यांच्या मनातून वारी करतो.
शीतल पै काणे, CII IWN च्या माजी अध्यक्षा यांना आधी अनेक ट्रेकिंगचे अनुभव होते, पण त्या म्हणतात, “वारी हा पूर्ण वेगळा अनुभव आहे, तो तुम्हाला मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर बदलून टाकतो. वारी म्हणजे एक २१ दिवसांचा आध्यात्मिक प्रवास आहे. देहू आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पादुका घेऊन ही यात्रा सुरू होते आणि पंढरपूरला संपते. ही परंपरा तब्बल १००० वर्षांपासून चालू आहे आणि प्रत्येकासाठी खुली आहे.”
पांडुरंग-विठ्ठल हे त्यांच्या वडीलांच्या कुटूंबाकडचं कुलदैवत असल्यामुळे शीतल यांना लहानपणापासून अषाढी एकादशीच्या वारी विषयी माहित तर होत पण त्या विषयी एक खास आकर्षणही होतं. शीतल यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने मागच्या वर्षी वारीत सहभाग घेतलेला. त्यातूनच ह्या वर्षी स्वतः वारीला जाण्याची प्रेरणा मिळाल्याचं शीतल सांगतात. “आधी मी पुण्याला कारने जाणार होते, पण माझ्या रोटरी क्लबने (पणजी मिडटाऊन) FLY91 च्या विमानातून गोव्यातून पुण्याला जाण्याचं ठरवलं आणि मी त्यांना जॉईन केलं. विमान प्रवास खूपच आरामदायक आणि सोपा होता.”
तसंच लाखो लोकांना न चुकता, दर वर्षी पावसात किंवा प्रखर उन्हात चालत जाताना बघून, ह्या एवढ्या मेहनतीने चालण्यामागची भावना जाणून घेण्याच्या जिज्ञासेने हा अनुभव स्वतः घेण्याचे त्यांनी ठरवले. “खरं तर ह्या वारीत खरच खूप मजा आली. पण दररोज ३५+ किमी चालल्यामुळे पायाला फोड आले, सूज आली, विशेषतः तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी. मी मोठे बूट घेतले नव्हते, त्यामुळे खूप त्रास झाला. सासवड ते जेजुरी पावसात चालणं कठीण होतं. पण सकाळची वेळ मला फार आवडली, शांतता, थंडी आणि रम्य,” त्यांनी वारीच्या दरम्यान आलेल्या शारीरिक अडचणींबद्दल भाष्य केलं.
शीतल यांनी पुण्याच्या हडपसरहून प्रवास सुरू केला आणि 6 दिवसांत 210 किमी पूर्ण केले. ज्याल्या कमीत कमी तीन आठवडे लागतात ते त्यांनी सहा दिवसात पुर्ण केलं. प्रवासात त्यांना पुण्याची दोन जोडपी व काही लोक भेटले ज्यांनी सात वेळा वारी केली होती. त्यांच्याच कुठे थांबायचं, काय घ्यायचं, चालायचा वेग कसा ठेवायचा आणि त्यांच्या अनुभवाच्या गोष्टींमधून वारी पुर्ण करण्याचं मार्गदर्शन मिळाल्याचं शीतल सांगतात. “पाचव्या दिवशी मी थांबले होते आणि एक वयोवृद्ध गृहस्थांनी मला चहा-बिस्किट दिली. मी पायाला औषध लावायला बुट काढलेले असताना, तिथे त्यांची मुलगी बाहेर आली आणि माझे पाय दाबायला लागली. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण ती म्हणाली, ‘वारीकऱ्याची मदत केली की पुण्य मिळतं’,” हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय असल्याचं त्या म्हणाल्या. लाखोंची गर्दी असूनही, कुठेही गोंधळ नव्हता, कोणी थांबलं तर सगळे थांबत, कोणताही गोंगाट नव्हता, एक सुसंस्कृत, भक्तिभावाने चालणारा समुदायाचा अनुभव घेतल्या बद्दलही त्यांनी ह्या वेळी म्हटलं.
शेवटच्या टप्प्यात त्यांच्या पती सुनील पै काणे यांनी त्यांना साथ दिली. FLY91 ने गोवा ते सोलापूर थेट विमानसेवेमुळे हे शक्य झालं. ह्या विमानसेवेमुळे शीतल आनी त्यांचे पती सुनीलनी वारीचा शेवटचा टप्पा एकत्र चालत पार केला आणि तो दोघांसाठीही खूप खास क्षण असल्याचं ते म्हणतात. FLY91 ने सुरू केलेली गोवा ते सोलापूर ही नवीन विमानसेवा अनेक गोमंतकीयांना वारीचा अनुभव घेण्यासाठी किंवा अगदी निःसंकोच पंढरपूर भेट देण्यासाठी प्रोत्साहित करेल असा विश्वासही शीतल यांनी व्यक्त केला.
“जेव्हा मला FLY91 कडून गोवा-सोलापूर मार्ग सुरू होणार असल्याचं समजलं, तेव्हा खरंच खूप उत्साह वाटला, कारण वारी नुकतीच सुरू झाली होती आणि सगळं लक्ष पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवासावर केंद्रित होतं. टियर ३ शहरांशी चांगली जोडणी होणं हे एक मोठं पाऊल आहे. सकाळी ६ वाजता गोव्यातून निघून १० वाजेपर्यंत पंढरपूरला पोहोचता येणं, म्हणजे चार तासांच्या आत, हे खरंच आश्चर्यकारक होतं. मला अजूनही आठवतं, आधी आम्हाला कोल्हापुरात रात्री थांबावं लागायचं आणि दुसऱ्या दिवशी तीन-चार तासांचा लांब ड्राइव्ह करून पंढरपूर गाठावं लागायचं. त्यामुळे आता घरातून थेट पंढरपूरला सहज आणि वेळेत पोहोचता येणं ही एक वेगळीच अनुभूती होती,” पै काणे ग्रुपचे, ग्रुप सिएफओ व शीतल यांचे पती सुनील पै काणे म्हणाले.
ह्या मार्गावर सुरू केलेली विमानसेवा भारताच्या उड्डाण क्षेत्रातील प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे असं सुनील यांनी वाटतं. नवीन विमानतळ, नवीन विमानसेवा आणि प्रादेशिक जोडणी सुधारली जाणं, हे सगळं अशा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी FLY91 ने बऱ्याचदा बंगळुरू, पुणे आणि इतर ठिकाणी प्रवास केला आहे, आणि प्रत्येक वेळी सेवा त्यांना खूप छान वाटली. सेवा वैयक्तिक आणि आपुलकीची आणि इतर प्रवाशांनाही तितकंच मनापासून स्वागत मिळाल्यान विमानसेवेचं सातत्य दिसून येतं असल्याचं ते सांगतात.
शीतल व सुनील यांच्या वारी विषयी बोलताना FLY91 चे एमडी व सीईओ मनोज चाको म्हणाले, “शीतलने २१० किमीची पंढरपूर वारी पूर्ण केल्याचं खरंच कौतुक करावं असं आहे आणि FLY91 च्या वतीने आम्हाला तिच्या या प्रवासाचा एक भाग होण्याचा आनंद आहे.”
फ्लाय ९१ विमानसेवा असलेले सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, अगत्ती (लक्षद्वीप), गोवा, हैदराबाद, बंगळुरू आणि पुणे, काही ठिकाणे ही महत्त्वाची धार्मिक स्थळं देखील आहेत. उदाहरणार्थ, सोलापूर हे पंढरपूरच्या जवळ असल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. पंढरपूर हे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध असून लाखो भाविक खासकरून आषाढी एकादशीनिमित्त इथे येतात. FLY91 च्या थेट गोवा-सोलापूर विमानसेवेच्या माध्यमातून, भाविक व प्रवासी आता पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग अशा धार्मिक व सांस्कृतिक स्थळांपर्यंत ह्या विमानसेवेच्या साहाय्याने भाविकांना सहज पोहोचत यावे हेच उद्धीष्ट असल्याचे चाको म्हणाले. “ही सर्व ठिकाणं महाराष्ट्र व देशभरातून दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतात. FLY91 ही एकमेव विमानसेवा आहे जी या श्रद्धास्थानांना गोव्याशी सुंदरपणे जोडते” असं चाको गोवा-सोलापूर जोडणीबाबत म्हणाले.
“विठ्ठल म्हणजे माझ्यासाठी कृष्णच, प्रेमळ, जवळचा आणि आपल्यासारखा. आणि वारी म्हणजे प्रत्येक गोमंतकीयाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी गोष्ट आहे,” असं शितल विठ्ठल आणि वारी बद्दल म्हणतात.
Valpoi Records Highest Rainfall, Pernem Receives the Lowest in Goa During Last 24 Hours
मुख्यमंत्र्यांहस्ते पत्रकार कृत्तज्ञता निधी योजनेखाली मंजुरी पत्र प्रदान
“Kosambi biography, excellent gift on genius’ 119th birth anniversary’” opine scholars
हंसापूर (पेडणे) येथे ५४ व्या संस्कार वर्गाचे उत्साहात उद्घाटन
‘Rashtriya Shuddhikaran Din’ Observed in Solapur; Five Re-enter Hindu Dharma
Roundglass Tennis Academy’s Puneeth Manohar crowned Doubles Champion at U-14 Super Category event in Germany