गोवा खबर : स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकर भरतीतील अनुशेष सरकारने गांभीर्याने भरावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी केली.
विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना युरी आलेमाव म्हणाले, ही प्रलंबित मागणी असून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे.

गोवा मुक्तीला जवळपास ६४ वर्षे उलटली तरी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या भरतीत अजूनही बॅकलॉग आहे. आपणही आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतकालात आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मते आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्तीला उशीर केला, तरी सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या भरतीला उशीर करू नये, असे आलेमाव म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची नोकर भरती जलद गतीने करण्याची मागणी युरी आलेमाव यांनी सरकारकडे केली आहे.