गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी पेडणे येथे ७८ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात राष्ट्रीय तिरंगा फडकविला आणि स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्या व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे १९ डिसेंबर २०२४ पूर्वी उद्घाटन केले जाईल अशी घोषणा केली. स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. त्यांनी या सरकारने गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांच्या बांधलेल्या स्मारकाचांही उल्लेख केला. १९५५ मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी कर्नलसिंग बेनिपाल यांनी केलेल्या अंतिम बलिदानाचा आदर करण्यासाठी आणि स्मरण ठेवण्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्या घराला भेट दिली आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार केला असे त्यांनी नमुद केले.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाविन्य, हरित ऊर्जा आणि स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करून विविध मार्ग दाखविले आहेत असे सांगितले. गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांमध्ये ३०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत केंद्र सरकार आगामी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी अतिरिक्त ३०.००० कोटींची तरतूद करणार असून सर्व तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय उर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष रोहिदास रघुनाथ नाईक देसाई यांनी शहीद स्मारकावर पुष्पांजली वाहिली.
चांदेल येथील बाल भवनातील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतांवर कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, पेडणे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात झाली आहे. भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धनाद्वारे शाश्वत विकास साधला जाईल असा निष्कर्ष त्यांनी काढला.
यावेळी तोरसेच्या सरपंच स्वाती तोरस्कर, जिल्हा दंडाधिकारी डॉ स्नेहा गिते, पोलीस अधिक्षक, जि.प. सदस्य, उपजिल्हाधिकारी आणि एसडीओ शिवप्रसाद नाईक व पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी उपस्थित होते.