Connect with us

गोवा खबर

भाजप सरकारने सामान्यांचे जगणेच केले महाग : प्रत्येक दरवाढ ही सर्वसामान्य कुटुंबांवरील थेट आर्थिक मार : पणजीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारच्या काळात इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींचा तीव्र निषेध केला. सामान्य जनता प्रचंड महागाईच्या ओझ्याखाली भरडली जात असताना सत्ताधारी नेते मात्र वास्तवापासून पूर्णपणे दूर असल्याची टीका अमरनाथ पणजीकर यांनी केली.

अमरनाथ पणजीकर म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, दूध, ब्रेड आणि इतर अत्यावश्यक वस्तूंवरील ताज्या दरवाढींमुळे सामान्य कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. पेट्रोल पंप, किराणा दुकान किंवा बाजारपेठेत जाणे हे आता सामान्य नागरिकांसाठी वेदनादायक अनुभव बनले असून महागाई नियंत्रणात आणण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.

अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले की, भाजप नेते “विकास” आणि “विकसित भारत”च्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना वाढते खर्च, घटती बचत आणि आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च, अन्नधान्याचे दर, शालेय खर्च, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट महाग होत असून त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्ग, युवक, कामगार, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमरनाथ पणजीकर यांनी आरोप केला की, भाजप सरकारने करांचा बोजा आणि सततच्या दरवाढींमधून जनतेला लुटण्याचे धोरण स्वीकारले आहे, तर दुसरीकडे जाहिरातबाजी, कार्यक्रम आणि राजकीय प्रचारावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. जनतेला काटकसरीचे धडे देणारे सरकार इंधन व अत्यावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्यास मात्र तयार नसल्याची टीका त्यांनी केली.

अमरनाथ पणजीकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, पगार स्थिर असताना आणि उत्पन्नात वाढ नसताना सामान्य कुटुंबांनी सततच्या महागाईत जगायचे कसे? जागतिक परिस्थितीचे कारण पुढे करून भाजप सरकार स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. पेट्रोलियम पदार्थांवरील प्रचंड कर आणि अनियंत्रित महागाईमुळे घरगुती अर्थसंकल्प पूर्णपणे कोलमडत असल्याचे त्यांनी म्हटले.

अमरनाथ पणजीकर पुढे म्हणाले की, भाजपचे तथाकथित “डबल इंजिन सरकार” आता जनतेसाठी “डबल बोजा सरकार” ठरले आहे. इंधन, अन्नधान्य, दूध, स्वयंपाकाच्या वस्तू आणि वाहतुकीसाठी लोकांना अधिक पैसे मोजावे लागत असताना बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरताही वाढत चालली आहे.

अमरनाथ पणजीकर यांनी इंधनावरील करात तात्काळ कपात करून महागाई नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. सरकारच्या प्रचारकी दाव्यांमध्ये आणि जनतेच्या वास्तवातील हालअपेष्टांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून लोकांचा संयम आता संपत चालल्याचा इशाराही त्यांनी दिला.