गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘पर्यावरण – 2025 ‘ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.
पर्यावरणाशी संबंधित सर्व दिवस हा संदेश देतात की आपण दररोज पर्यावरणीय उद्दिष्टे आणि संबंधित कार्यक्रम लक्षात ठेवले पाहिजेत; तसेच शक्य तितके त्यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

जागरूकता आणि सर्वांच्या सहभागावर आधारित सतत सक्रियतेतूनच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन शक्य होईल, यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, निसर्ग, आईप्रमाणे आपले पोषण करतो यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे आपण निसर्गाचा आदर आणि संरक्षण केले पाहिजे. विकासाच्या भारतीय वारशाचा आधार पोषण आहे, शोषण नाही; संरक्षण आहे, निर्मूलन नाही. या परंपरेचे अनुसरण करून, आपल्याला विकसित भारताकडे वाटचाल करायची आहे. गेल्या दशकात, आंतरराष्ट्रीय करारांनुसार भारताने राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या योगदानाची लवकर पूर्तता करण्याची अनेक उदाहरणे साध्य केली आहेत या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

एनजीटीने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या पृथ्वीच्या भविष्यावर व्यापक परिणाम होतो. पर्यावरण व्यवस्थापन इको-सिस्टमशी संबंधित संस्था आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या देशाला आणि संपूर्ण जागतिक समुदायाला पर्यावरणपूरक मार्गाचा अवलंब करावा लागेल असे राष्ट्रपती म्हणाल्या. तरच मानवजातीची खरी प्रगती होईल. भारताने आपल्या हरित उपक्रमांद्वारे जागतिक समुदायासमोर अनेक अनुकरणीय उदाहरणे सादर केली आहेत असे त्यांनी सांगितले.