Connect with us

गोवा खबर

मला ‘वंदे मातरम’ 90च्या पिढीसाठी अधिक आकर्षक बनवायचे होते : भरत बाला

Published

on

Spread the love

गोवा खबर : माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि वंदे मातरम गीत 90 च्या पिढीसाठी अधिक आकर्षक बनवण्याच्या त्यांच्या विनंतीला अनुसरून मी ए.आर.रेहमान यांचा ‘वंदे मातरम्’ हा लोकप्रिय अल्बम तयार केला, असे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भरत बाला म्हणाले.

गोव्यात 55 व्या इफ्फीमध्ये ‘सिनेमाशी संबंधित कथा सांगण्यासाठी संदर्भ म्हणून संस्कृती’ या विषयावरील पॅनेल चर्चेत ते बोलत होते. नामवंत लेखक डॉ. सच्चिदानंद जोशी आणि अमिश त्रिपाठी हे पॅनेलमधील अन्य  वक्ते होते.

बाला म्हणाले की, जाहिरात म्हणजे उत्पादनासाठी उत्साह आणि औत्सुक्य निर्माण करणे आहे. त्याचप्रमाणे ‘वंदे मातरम’ गीत नवीन पिढीसाठी आकर्षक बनवायचे होते आणि ‘वंदे मातरम्’ अल्बम गाणे याच विचारातून साकार झाले.

बाला यांनी सांगितले की, ते व्हर्च्युअल भारत नावाच्या एका नवीन प्रकल्पावर काम करत आहेत ज्यामध्ये देशाच्या विविध भागातून आलेल्या 1000 कथांद्वारे भारताचा इतिहास मांडला जात आहे. चित्रपटांचे  क्राउड फंडिंग सर्वसामान्यांना त्यांना पहायच्या असलेल्या कथा निवडण्याचा अधिकार देऊ शकते, जे साधारणपणे कोणती कथा निवडायची हे निर्माते किंवा दिग्दर्शक ठरवतात, असे बाला यांनी समारोप करताना सांगितले.

‘द शिवा ट्रायलॉजी’ आणि ‘रामचंद्र सीरिज’चे लोकप्रिय लेखक अमिश त्रिपाठी म्हणाले की, अनेक दशकांपासून चित्रपट हे समाजातील वास्तव चित्रित करत आहेत. ते पुढे म्हणाले की जेव्हा कथाकार त्याच्या सांस्कृतिक भोवतालाशी जोडलेला असतो, तेव्हा आणखी अस्सल कथा समोर  येतील.

आपल्या प्राचीन साहित्याने दिलेल्या वैविध्यपूर्ण कथांचा वापर करण्यात हिंदी चित्रपट उद्योग कमी पडतो, त्याउलट प्रादेशिक चित्रपटात  अशा कथा निवडण्याचे प्रमाण चांगले आहे,  असे मत त्रिपाठी यांनी मांडले.

प्रसिद्ध लेखक आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे  सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले की, मोबाईल फोन्स आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून पारंपारिक कथा सांगणे हळूहळू संपवत आहेत. सामान्य लोकांच्या असामान्य कथा ज्या आता आपल्या ज्येष्ठांच्या माध्यमातून सांगितल्या जात नाहीत, त्या आता चित्रपटांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “अभिजात साहित्यावर आधारित पटकथाना  अंतिम रूप देताना संशोधनाचा अभाव आता अभिजात साहित्याच्या विविध रूपांतरणातील  घटक एकत्र करून भरून काढला जात आहे,” असे जोशी म्हणाले.

सुप्रसिद्ध लेखक मकरंद परांजपे यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले.