Connect with us

गोवा खबर

एएनआर यांच्या दूरदृष्टीने तेलुगु चित्रपटसृष्टीला दखल घेण्याजोगी शक्ती बनवले : नागार्जुन अक्किनेनी

Published

on

Spread the love

गोवा खबर : 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) “शताब्दी विशेष एएनआर: अक्किनेनी नागेश्वर राव यांचे जीवन आणि कार्य यांचा सोहोळा” नामक विशेष सत्राच्या आयोजनाद्वारे भारतीय चित्रपटविश्वातील मान्यवर अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) यांना आदरांजली वाहिली आहे. पणजी येथील कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात सुप्रसिध्द अभिनेत्री खुशबू सुंदर एएनआर यांचे पुत्र नागार्जुन अक्किनेनी यांच्याशी यांनी संवाद साधला.

एएनआर यांचा वारसा आणि तेलुगु चित्रपट सृष्टीला आकार देण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे दर्शन घडवणारा स्मरणार्थ व्हिडीओ सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागार्जुन यांनी त्यांच्या वडिलांच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या आणि या उद्योगाबाबत त्यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीचे ठळक वर्णन केले.

“माझ्या वडिलांचे उद्दिष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी शक्ती बनवणे,” नागार्जुन म्हणाले. “त्यांनी अन्नपूर्णा स्टुडीओजची स्थापना केली, आजतागायत ही संस्था चित्रपट उद्योगाचा आधारस्तंभ म्हणून काम करत आहे.” तेलुगु चित्रपटविश्वाला अखिल भारतीय स्वरूप देण्यासंदर्भात एएनआर यांच्या दूरदृष्टीवर देखील त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “कोणत्याही बाबतीत भाषा हा अडसर नसला पाहिजे हा त्यांचा विश्वास त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढचा होता.”

खुशबू सुंदर यांनी एएनआर यांचा वारसा पुढे नेण्याच्या जबाबदारीबाबतच्या चर्चेत नागार्जुन यांना कौशल्याने सहभागी करून घेतले. अन्नपूर्णा चित्रपट महाविद्यालयासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून एएनआर यांच्या संकल्पनांची जपणूक करण्याचे श्रेय स्वतःच्या कुटुंबाला देऊन  नागार्जुन म्हणाले, “हे काम म्हणजे चित्रपट निर्मात्यांच्या पुढील पिढीसाठी मंच तयार करून ठेवणे आहे.”

संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रात नागार्जुन यांना एएनआर यांच्या चरित्रपटाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एका माहितीपटाचे नियोजन करत असल्याची माहिती नागार्जुन यांनी दिली. “माहितीपटातून एएनआर यांचे जीवन आणि दूरदृष्टी अधिक चांगल्या प्रकारे चित्रित करता येईल,” ते म्हणाले.

एएनआर या चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तित्वाच्या चिरस्थायी वारशाद्वारे प्रेक्षकांना प्रेरणा देत नागार्जुन आणि खुशबू सुंदर यांच्यातर्फे त्यांच्या कालातीत योगदानाचा उत्सव साजरा करुन हे सत्र संपले.