गोवा खबर : भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) काल रात्रीच्या आव्हानात्मक शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान संकटग्रस्त एमव्ही आयटीटी प्युमावरील 11 कर्मचाऱ्यांची सुटका केली. मुंबई नोंदणीकृत हे मालवाहू जहाज कोलकाताहून पोर्ट ब्लेअरला जात असताना सागर बेटाच्या (पश्चिम बंगाल) दक्षिणेस सुमारे 90 नॉटिकल मैल बुडत असल्याचा इशारा प्राप्त झाला.
प्रथम चेन्नईच्या सागरी शोध आणि बचाव समन्वय केंद्राकडे (एमआरसीसी) 25 ऑगस्ट 2024 रोजी रात्री एक धोक्याचा इशारा प्राप्त झाला. कोलकाता येथील भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाने (ईशान्य) दोन आयसीजी जहाजे आणि एक डॉर्नियर विमान तातडीने घटनास्थळी रवाना केले. रात्रीच्या वेळी सक्षम अशा प्रगत सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या डॉर्नियर विमानाद्वारे तरंगणारे जीवरक्षक तराफे आणि बचावासाठी मदत मागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातातील लाल बावटे निदर्शनास आले.
विमानाद्वारे प्राप्त माहितीनुसार आयसीजी जहाज समन्वित ठिकाणी पोहोचले जिथे वाचलेल्यांसाठी दोन जीवरक्षक तराफे एकत्र बांधलेले आढळले. प्रतिकूल परिस्थितीतही, सारंग आणि अमोघ या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी डॉर्नियर विमानासह केलेल्या समन्वित समुद्र-हवाई बचाव कार्यात 25 ऑगस्टच्या मध्यरात्री आणि 26 ऑगस्टच्या पहाटे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेत हे बचाव कार्य पूर्णत्वाला नेले.