गोवा खबर : मांद्रे पंचायत क्षेत्रातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय व चिखलमय बनले असून, गटार व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
मांद्रे पंचायतीने पुढाकार घेऊन पंचायत निधीतून गटारे उपसण्याचा उपक्रम राबवला. गटारे उपसत असताना गटारातील माती चिखल गटाराच्या बाजूलाच ठेवण्यात आला. पावसाळ्यात सगळी माती या गटारात पुन्हा पडून गटारे चिखलाने भरली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी गटारात न जाता थेट रस्त्यावरून वाहत आहे. याकडे आता पंचायतीने लक्ष देऊन योग्य पद्धतीने गटार उपसावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
ज्या पद्धतीने मांद्रे पंचायत क्षेत्रातील गटार व्यवस्था कोलमडलेली आहे त्याच पद्धतीने या पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्ते खड्डेमय बनले आहेत. रस्त्याची डागडुजी करत असताना सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यावेळी ग्रामस्थ किंवा पंचायत मंडळाचा एखादा प्रतिनिधी आवाज करतो त्यावेळी डोळ्याला पाने पुसण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते ज्या रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमध्ये दगड व माती घालून तो बुजवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा मोठा पाऊस पडला आणि अवजड वाहने त्यावरून गेली की सुरुवातीला छोटे पडलेले खड्डे कालांतराने मोठे होतात. त्यामुळे सर्वच रस्ता खड्डेमय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.