गोवा खबर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सनातन संस्थेने प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हे निधन नसून व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याची टीका केली आहे.
संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटले की, २०१५ मध्ये समीर गायकवाड यांना या प्रकरणात नाहक अडकवण्यात आले होते. तपासादरम्यान ते हत्येच्या दिवशी पालघरमध्ये असल्याचे पुरावे असतानाही दबावापोटी त्यांना १९ महिने तुरुंगात डांबण्यात आले. पुढे तपासाची दिशा बदलून पोलिसांनी नवीन नावे समोर आणली, मात्र समीर गायकवाड यांच्यावरील ‘आरोपी’ हा शिक्का पुसला गेला नाही.
-
मानसिक छळ: न केलेल्या गुन्ह्यासाठी झालेली बदनामी आणि तपास यंत्रणांच्या छळामुळे समीर यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांना नोकरी मिळवणे कठीण झाले होते.
-
कायदेशीर संघर्ष: लोकशाहीत प्रत्येकाला बचावाचा हक्क असताना, समीर यांना कोल्हापुरातून वकीलही मिळू दिला गेला नव्हता, असा आरोप संस्थेने केला आहे.
-
व्यवस्थेवर टीका: अजमल कसाबसारख्या दहशतवाद्याला सरकारी वकील मिळतो, मात्र एका गरीब शेतकरी कुटुंबातील हिंदू साधकाला अन्यायाचा सामना करावा लागला, अशी खंत राजहंस यांनी व्यक्त केली.