गोवा खबर : चार दिवस चाललेला इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) २०२५ हा तंत्रज्ञान मेळावा ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाने दूरसंचार क्षेत्रातील नवकल्पनांचे आणि डिजिटल परिवर्तनाचे महत्त्व ठळकपणे दाखवून दिले.
हा मेळावा दूरसंचार विभाग (डीओटी) आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, केंद्रीय संचार मंत्री श्री. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबर रोजी झाले. आयएमसी च्या नवव्या आवृत्तीत जगभरातील तंत्रज्ञान नेते, नवोपक्रमक, स्टार्टअप्स आणि धोरणकर्त्यांचा सहभाग होता.
गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाचे (डीआयटीईएन्डसी) प्रतिनिधीमंडळ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व मंत्री रोहन खंवटे यांनी केले. त्यांच्यासोबत सचिव संजीव आहुजा (आयएएस), संचालक कबीर शिरगावकर, संयुक्त संचालक डॉ. मिलिंद सखारदांडे आणि मंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी नेव्हिल नोरोन्हा उपस्थित होते. या टीमने गोव्याचा वाढता टेक इकोसिस्टम सादर केला.
खंवटे म्हणाले, “भारताच्या डिजिटल भविष्यात गोवा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकार दूरसंचार पायाभूत सुविधा वाढवण्यावर आणि लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यावर भर देत आहे. गोव्याचा स्टार्टअप इकोसिस्टम नवकल्पनांची पुढची लाट आणत आहे. आयएमसी २०२५ हे आमच्या स्टार्टअप्ससाठी जागतिक उद्योग नेत्यांशी जोडण्याचे आणि आपले काम प्रदर्शित करण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ ठरले.”
गोव्यातील पाच स्टार्टअप्स, एव्योट वेन्चर्स प्रायव्हेट लिमीटेड, लिंक हॉल प्रायव्हेट लिमीटेड., स्पिंटली, बायहॉर्स, आणि स्वायू आयटी प्रायव्हेट लिमीटेड यांनी या प्रदर्शनात भाग घेतला. या स्टार्टअप्सनी आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान उपायांची ओळख १.५ लाखांहून अधिक उपस्थितांसमोर करून दिली.
कार्यक्रमाबद्दल बोलताना लिंक हॉल चे असोसिएट डायरेक्टर अनीश म्हणाले, “आयएमसी २०२५ हा नवोपक्रमकांशी संवाद साधण्याचा, नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याचा आणि आपले काम दाखवण्याचा उत्कृष्ट अनुभव होता. गोवा डेलिगेशनचा भाग होणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गोवा सरकार आणि गोवा स्टार्टअप मिशनकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”
बायहॉर्स चे सोशल मीडिया मॅनेजर कुणाल यांनी सांगितले, “दिल्लीतील आयएमसी मध्ये भाग घेणे एक जबरदस्त अनुभव होता! तिथली ऊर्जा, कल्पना आणि संवाद अप्रतिम होते. तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचे भविष्य घडवणाऱ्या या समुदायाचा भाग बनणे खूप प्रेरणादायी आहे.”
स्वायु आयटी प्रायव्हेट लिमीटेड चे संस्थापक आशीष म्हणाले, “अशा मोठ्या कार्यक्रमाचा भाग होणे खूप छान वाटले. दोन एकरात पसरलेल्या ३००० पेक्षा अधिक लोकांसमोर आपले काम सादर करणे हे एक रोमांचक आव्हान होते. नवीन शिकण्याची आणि पाहण्याची संधी मिळाली. या अनुभवासाठी एसआयटीपीसीचे मनापासून आभार.”
गोव्याच्या या सहभागामुळे राज्याची भारताच्या वाढत्या तंत्रज्ञान क्षेत्रातील भूमिका अधोरेखित झाली. गोव्याच्या स्टार्टअप्सनी आपली क्षमता, नवकल्पना आणि डिजिटल भविष्यातील योगदान दाखवून दिले. आयएमसी २०२५ ने पुन्हा एकदा सिद्ध केले की नवोपक्रमच तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि नेटवर्किंग या तिन्ही क्षेत्रांसाठी प्रगतीचा पाया आहे.