गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भरतीच्या पारदर्शक प्रक्रियेमुळे सरकारवरील लोकांचा विश्वास दृढ झाला असल्याचे सांगितले. आज पणजीतील पाटो येथे गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आता परीक्षा सभागृह सोडण्यापूर्वी त्यांचे निकाल पाहू शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी विविध खात्यांना त्यांच्या विभागाच्या गरजेनुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश सरकारने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मुख्य सचिव आणि गोवा कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, आयोगाचे सदस्य नारायण सावंत, आयएएस (निवृत्त), गोवा कर्मचारी निवड आयोगाचे सचिव शशांक ठाकूर, दौलत हवालदार (आयएएस), निवृत्त, आदी उपस्थित होते. आयोगाचा लोगो डिझाइन करणारे कलाकार सिद्धार्थ गायतोंडे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.