गोवा खबर : आज धकाधकीच्या जीवनामध्ये तणाव निर्माण करणारे अनेक प्रसंगाला सर्वांना सामोरे जावे लागते. ताणतणावामुळे पुढे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवत असतात. यासाठी तणाव घालवणे अत्यावश्यक ठरते. वास्तविक तणाव निर्माण व्हायला आपल्या मनामध्ये असलेले अयोग्य संस्कार कारणीभूत असतात. कोणत्याही प्रसंगामध्ये अयोग्य संस्कारामुळे अयोग्य प्रतिक्रिया दिली जाते आणि त्यामुळे तणाव निर्माण होत असतो. ही अयोग्य प्रतिक्रिया योग्य प्रतिसादामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजेच तणावमुक्त जीवन जगणे होय. तणावमुक्त जीवन जगायला शिकणे, ही काळाची गरज आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या शुभा सावंत यांनी केले.
वास्को येथील ‘हॉटेल ला पास’ तेथील कर्मचार्यांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म ’ या विषयावर सावंत नुकत्याच मार्गदर्शन करत होत्या.

सावंत म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणाव घालवण्याचा सुलभ आणि अध्यात्मशास्त्रातील असा एक मार्ग म्हणजे नित्यनेमाने नामस्मरण करणे हा आहे. जीवनामध्ये येणारे प्रसंग हे अचानकच घडत असतात आणि या प्रसंगांवर मात करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक प्रशिक्षण असणे आवश्यक असते. यासाठी स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण सर्वांनी शिकून घेतले पाहिजे.
या मार्गदर्शनाचा लाभ बिट्स पिलानी येथील प्रा. देबासिस पटनायक, निवृत्त आयएएस अधिकारी अरुण नाईक, विश्व हिंदू परिषदेचे संजय कोरगावकर, व्यावसायिक सिद्धेश रायकर, वरून कुमार आदी मिळून एकूण ३५ जणांनी घेतला.