Connect with us

गोवा खबर

नवी दिल्ली येथे दहशतवादविरोधी एडीएमएम-प्लस तज्ञ कार्यगटाची 14वी बैठक संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर : आसियान देशातील संरक्षण मंत्र्यांची (एडीएमएम-प्लस) दहशतवादविरोधी तज्ञ कार्यगटाची  (EWG on CT) 14 वी बैठक 19 ते 20 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. आसियान सचिवालय, आसियान देश (लाओ पीडीआर, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम), एडीएमएम-प्लस सदस्य देश (चीन, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि कोरिया प्रजासत्ताक/ रिपब्लिक ऑफ कोरिया) यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला. 

सीटीवरील 14व्या एडीएमएम-प्लस ईडब्ल्यूजी दरम्यान, भारत आणि मलेशियाच्या सह-अध्यक्षांनी 2024-2027या कालावधीच्या नियोजित उपक्रमांसाठी कार्य-योजना सादर केली. 2026 मध्ये मलेशियामध्ये सीटीवरील ईडब्ल्यूजीसाठी टेबल-टॉप चर्चा/विचार विनिमय आणि 2027 मध्ये भारतात फील्ड प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली.

दोन दिवसांच्या या बैठकीत, दहशतवाद आणि उग्रवादाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी एक मजबूत आणि व्यापक रणनीती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चर्चा करण्यात आली. आसियान देशांच्या संरक्षण दलांचे आणि त्यांच्या संवाद भागीदारांचे प्रत्यक्ष अनुभव सामायिक करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. या बैठकीत चालू वर्षासाठी नियोजित उपक्रम/बैठका/कार्यशाळांचा पाया रचण्यात आला. यापूर्वी, 2021-2024या वर्षांसाठी सीटीवर ईडब्ल्यूजीचे सह-अध्यक्ष असलेले म्यानमार आणि रशिया यांनी सध्याच्या कालावधीसाठी (2024-2027) भारत आणि मलेशियाला सह-अध्यक्षपद सोपवले . भारताने  चालू वर्षासाठी पहिली ईडब्ल्यूजी बैठक आयोजित केली.

उद्घाटन सत्रात, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी बीज भाषण दिले आणि उद्घाटन समारंभात सहभागी शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की दहशतवाद हे एक झपाट्याने वाढणारे आव्हान आहे आणि त्याचे धोके सीमा ओलांडून वाढत आहेत. 2022मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्षपदाच्या काळात दिल्ली घोषणापत्र स्वीकारण्यासह, या प्रदेशातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव [आंतरराष्ट्रीय सहकार्य (आयसी)] अमिताभ प्रसाद, अतिरिक्त महासंचालक (आयसी), भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहभागी देशांच्या प्रतिनिधी मंडळांच्या प्रमुखांनी आणि आसियान सचिवालयानेही या प्रदेशात दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याबाबत आपले विचार मांडले. सांस्कृतिक दौऱ्याचा भाग म्हणून प्रतिनिधींनी आग्र्यालाही भेट दिली