गोवा खबर:कारगिल विजय दिनानिमित्त मुंबईतील कुलाबा लष्करी तळावर 1999 च्या कारगिल युद्धातील भारताच्या विजयाच्या 27 वर्धापनदिनाचे अत्यंत गंभीर, सन्मानपूर्वक आणि श्रद्धाभावाने स्मरण करण्यात आले.
दक्षिण कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ परम विशिष्ट सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदक, नौसेना पदक प्राप्त, व्हाईस ॲडमिरल संजय वत्सयन, लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, परम विशिष्ट सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदक, सेना पदक प्राप्त – महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र आणि एअर व्हाईस मार्शल प्रशांत शरद वाडोडकर, एअर ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र क्षेत्र, यांनी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी, नागरी मान्यवर आणि माजी सैनिकांसह राष्ट्रसेवेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.
कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ मान्यवरांनी कुलाबा लष्करी तळावरील शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण केले.
या समारंभाच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाचे अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रसेवेसाठीच्या अखंड समर्पणाला मानवंदना अर्पण करण्यात आली. कारगिलमधील शूरवीरांच्या सर्वोच्च बलिदानातून देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्राप्रती असलेली अढळ निष्ठा यांची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयाला मिळत आहे.
या स्मरण सोहळ्याद्वारे भारताच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करताना अतुलनीय शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या आणि कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांप्रती राष्ट्राची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.