गोवा खबर : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या महान स्वातंत्र्य योद्ध्यांच्या कष्टामुळे आणि बलिदानामुळे आपण आपल्या देशाचा विकास करू शकलो. देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रशंसनिय विकास साधला आहे. जागतिक क्षेत्रात भारत देशाचा मानसन्मान वाढलेला आहे असे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त फोंड्याच्या ऐतिहासिक क्रांती मैदानावर राष्ट्रीय तिरंगा फडकविल्यानंतर नाईक बोलत होते.
नाईक यांनी पुढे बोलताना प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जातो. विविध संस्कृती, जाती आणि श्रद्धा बाजूला ठेवून आपला देश सतत विकसित आणि समृद्ध होत आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आपल्या देशाचा उल्लेखनीय विकास साधण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. आज गोवा राज्यानेही विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती केली आहे. लोकांनी शांतता आणि सलोखा राखून राज्याच्या विकासासाठी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे असे नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्याचा स्वयंपूर्णतेसह सर्वच क्षेत्रात सर्वांगिण विकास साधण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचे सांगितले. राज्याच्या समृद्धीसाठी लोकांचे योगदान आणि पाठबळही महत्त्वाचे आहे. आपल्या देशाचे महासत्तेत रूपांतर करण्यासाठी जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता सर्वांना एकत्र काम करण्याचे आणि सरकारला सहकार्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुरवातीस मंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पोलिस पथकाच्या संचलनाची त्यांनी पाहणी केली. फोंडा व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या समारंभाला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ३, विशाल कुंडईकर, उप. जिल्हाधिकारी व एसडीओ फोंडा शुभम नाईक, डीवायएसपी शिवराम वायंगणकर, लष्करी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, फोंडाचे नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक, सरकारी अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व इतर उपस्थित होते. गिरीश वेळगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.