शक्तीची उपासना करून धर्मकार्यात, विधायक कार्यात आणि राष्ट्रकार्यात शक्तीचा उपयोग करायला हवा. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंह, राजगुरु यांच्या कार्याचा इतिहास आणि पराक्रम अलौकिक आहे. ऐन तारुण्यात त्यांनी शक्तीची उपासना केली, म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागवू शकतो. हिंदू राष्ट्र झाल्यास त्या सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल, असे मार्गदर्शन प्रमुख वक्ते या नात्याने भारत माता की जय संघटनेचे विनय नाईक यांनी केले.
सांगे श्री विठ्ठल मंदिर सभागृहात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक उपस्थित होते.
नाईक म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापकडॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्र-धर्म कार्यात मोलाचे योगदान दिले. इतिहासातून प्रेरणा घेऊन आजच्या युवकांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी व्हायला हवे. युवा पिढीने संस्कारक्षम होऊन राष्ट्र-धर्म वाचवण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.