गोवा खबर : विठ्ठलापूर-साखळी येथे उद्यापासून (16) होणार्या भगवद्गीता पारायणात दीडशे पुरोहित सहभागी होणार आहेत. यावेळी हवन, यज्ञ व इतर धार्मिक विधी होणार आहेत. हा कार्यक्रम सात दिवस चालणार आहे, अशी माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
मकरसंक्रातीनिमित्त राणे यांनी विठ्ठलापूर-साखळी येथील पांडुरंग मंदिरात तसेच कारापूरच्या शांतादुर्गा मंदिरात मंगळवारी पूजाअर्चा केली.
उद्यापासून पांडुरंग मंदिरात भगवद्गीता पारायणाचा सोहळा होणार आहे. भक्तिभावाने सर्वांनी देवाची सेवा करावी, अशी इच्छा राणे यांनी व्यक्त केली.
अध्यात्म व भक्तीच्या मार्गाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडावा यासाठी आपले सदैव योगदान असेल. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाहीए. सत्तरी, डिचोली तालुक्यासह पेडणे तालुक्यातील सर्व देवस्थानांमध्ये आपण देवकार्य करणार, असे त्यांनी सांगितले.
आपण 2005 ते 2007 सालापासून काही ठिकाणी मंदिरांचे नूतनीकरणाचे काम केले. काही ठिकाणी मंदिरांचे बांधकाम केले तर काही ठिकाणी मंडपांचे काम केले. अशा सर्व देवस्थानांमध्ये भक्ती अधिक जागृत करावी, देवस्थाने अधिक जागृत करावीत, असा आपला हेतू असल्याचे राणे यांनी सांगितले.