केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबादमध्ये गुजरात लोकसेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘लोक सेवा उत्सव’ कार्यक्रमाला केले संबोधित
मोदी सरकारने असंख्य ट्रस्ट, व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने देशातील 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले आहे.
गोवा खबर:केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबाद येथे गुजरात लोकसेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘लोकसेवा उत्सव’ कार्यक्रमाला संबोधित केले.
भारतीय राज्यघटना तयार करताना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राज्यघटनेचे मूलभूत उद्दिष्ट हे कल्याणकारी राज्याची स्थापना असायला हवे असे नमूद केल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले. प्रत्येक व्यक्तीचे कल्याण, सर्वसमावेशक विकास आणि प्रत्येक कुटुंबाचे सन्माननीय जीवन सुनिश्चित करणारे राज्य निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट राज्यघटनेने ठेवले आहे यावर शाह यांनी भर दिला.
स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत प्रत्येक सरकारने आपल्या कार्यकाळात आपल्या क्षमतेनुसार काम केले. तथापि 2014 पूर्वी कोणत्याही सरकारने नागरिकांना दारिद्र्यातून मुक्त करण्याबद्दल विचार केला नव्हता, असे शाह म्हणाले. वर्ष 2014 मध्ये भारतातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडले आणि देशातील एकही घर जीवनासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी शौचालये, गॅस कनेक्शन, गरिबांसाठी घरे आणि प्रत्येक घरात मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले. याव्यतिरिक्त, भारत सरकार देशभरातील करोडो गरीब कुटुंबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्यसेवेचा खर्च उचलते, असे शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून सुरुवात केलेल्या आणि आता पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2024 दरम्यान आपल्या सरकारने देशाच्या राज्यघटनेच्या रचनाकारांनी कल्पना केलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना साकारली आहे. ते म्हणाले की मोदी यांनी देशभरातील लाखो लोकांसाठी मूलभूत सुविधांची तरतूद केली आहे. जोपर्यंत गरीब कल्याण कोट्यवधी वंचित नागरिकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, यावर शाह यांनी भर दिला.
पंतप्रधान मोदी यांनी गरीब कल्याण हा मंत्र ओळखला आणि समाजाच्या तळागाळात त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळेच आज देशातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, असे शाह यांनी सांगितले. एवढे मोठे उद्दिष्ट कोणतेही सरकार एकट्याने साध्य करू शकत नाही, असेही ते म्हणाले. असंख्य ट्रस्ट, व्यक्ती आणि सेवा देणाऱ्या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, आज गुजरात लोकसेवा ट्रस्टने 34 वर्षे पूर्ण केली असून 35 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 35 वर्षे सतत एका उद्देशासाठी काम करणारी कोणतीही संस्था कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.