संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विषय सादर करतांना शॉन क्लार्क.
Spread the love
गोवा खबर : प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्व हे काळचक्रानुसार वर–खाली होत असते. रज–तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो. परिणामस्वरूप पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढते. त्यामुळे जागतिक पातळीवर केवळ स्थुलातील उपायांविषयी प्रयत्न केले जात आहेत; पण ते पुरेसे नाहीत. आध्यात्मिक पातळीवरही प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेत. मंत्रोच्चार, अग्नीहोत्र, यज्ञ, साधना आदींद्वारे आपण आपल्या आयुष्याची आणि पर्यावरणाची आध्यात्मिक शुद्धी होऊ शकते आणि त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शॉर्न क्लार्क यांनी केले.
ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने (UN) आयोजित केलेल्या ‘सीओपी२९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने क्लार्क यांनी ‘सामाजिक सजगतेमुळे पर्यावरणाची हानी अल्प करता येईल का?’ या विषयावरील संशोधन सादर करतांना यज्ञाचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही सादर केली. हे संशोधन डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
क्लार्क यांनी सांगितले, आध्यात्मिक शुद्धतेचा अर्थात् सात्त्विकतेचा पंचमहाभूतांवर परिणाम होतो, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. नियंत्रित वातावरणात केलेल्या एका प्रयोगात ‘मंत्रोच्चारामुळे ज्योतीची उंची वाढते’, असे लक्षात आले.
कर्मा लेकलँड यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आश्वनी खुराना यांच्यासह शॉन क्लार्क.
सध्या पृथ्वीवर होत असलेले पर्यावरणातील पालट हे ९८ टक्के चक्रिय (सायक्लिकल) बदलांमुळे आहेत, तर केवळ २ टक्के मानवामुळे घडून येत आहेत. पॅरिस येथील परिषदेत पर्यावरणातील बदलांविषयी जी काही प्रारूपे आणि अंदाज बांधण्यात आले होते, त्यापेक्षा पुष्कळ अधिक वेगाने अन् तीव्रतेने पर्यावरणाचा र्हास होतांना दिसत आहे. वर्ष २००६ मध्येच या विषयावर आध्यात्मिक संशोधन करणार्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने पर्यावरणाच्या या तीव्र र्हासाचे कारण केवळ स्थूलातील नसून सूक्ष्मातील अर्थात् आध्यात्मिकही आहे, असे अनुमान काढले होते.
या परिषदेत प्राचीन भारतीय शास्त्रांवर आधारित आध्यात्मिक सूत्रांच्या साहाय्याने वातावरणातील पालटांची तीव्रता न्यून करण्याचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे’, असे मत आय.एस्.आर्.एन्.चे प्रमुख कार्यकारी अधिकारी तोष गुप्ता आणि पर्यावरणतज्ञ अन् कर्मा लेकलँड यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आश्वनी खुराना यांनी व्यक्त केले.
गेल्या ८ वर्षांत‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने २० राष्ट्रीय आणि ९६ आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला उत्कृष्ट सादरीकरणाचे पुरस्कार मिळाले आहेत.