गोवा खबर: गोव्याच्या प्राचीन समुद्रकिनाऱ्यांचे पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्य जपण्याच्या उद्देशाने केलेल्या एका निर्णायक कारवाईमध्ये, गोवा पर्यटन खात्याने काणकोण येथील राजबाग समुद्रकिनाऱ्यावरील सात बेकायदेशीर बांधकामे, यशस्वीरित्या पाडली आहेत. ही कारवाई राज्यातील किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी तसेच गोव्याची, प्रतिष्ठित समुद्रकिनारी गंतव्यस्थान म्हणून अखंडता राखण्यासाठी, कायदेशीर नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या खात्याच्या वचनबद्धतेशी संरेखित आहे.
या आवश्यक परवानग्यांशिवाय बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे, केवळ पर्यावरणालाच धोका निर्माण झाला नसून, समुद्रकिनाऱ्याच्या नैसर्गिक विस्तारालाही बाधक ठरले आहे. दक्षिण विभागीय कार्यालयातील, पर्यटन विभागाच्या अंमलबजावणी पथकाने, पर्यटन उपसंचालक श्री. धीरज वागळे यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक प्राधिकरणांच्या समन्वयाने गोव्याच्या किनारपट्टीवरील अनधिकृत विकासांना आळा घालण्यासाठी व्यापक, चालू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून ही कारवाई केली आहे.
या कारवाईबद्दल बोलताना, पर्यटन संचालक तथा जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस, म्हणाले, कि “गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटक आणि स्थानिक दोघांसाठीही सुंदर, सुरक्षित आणि टिकाऊ वातावरणात राहतील याची खात्री करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या किनारी क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या पर्यावरणीय समतोल आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या, कोणत्याही गोष्टीवर देखरेख ठेवू आणि त्याविरुद्ध आवश्यक पावले उचलून कारवाई करू.”
पर्यटन खात्याकडून लोकांना आणि पर्यटन हितधारकांना जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि गोव्याचे समुद्रकिनारे स्वच्छ, कायद्याचे पालन करणारे क्षेत्र म्हणून राखण्यासाठी, त्यांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे राज्याचे नैसर्गिक आकर्षण आणि आदरातिथ्य दिसून येते.