गोवा खबर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्या जवळील 39 मतदारसंघांची जबाबदारी गोव्यातील आजी-माजी आमदार, मंत्र्यांवरही देण्यात आली आहे. या अनुषंगाने नुकतीच चिपळूण येथे बैठक झाली. १८ तारखेपासून गोव्यातील भाजपा नेते तब्बल दोन महिने कोकणात तळ ठोकून असणार आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह राज्यातील २० ते २२ आजी माजी आमदार, पदाधिकाऱ्यांनी नुकतीच चिपळूण येथील बैठकीस उपस्थिती लावली.गोव्यातील भाजपा नते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व इतर ठिकाणी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
चिपळूण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार दाजी साळकर, केदार नाईक, प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर, माजी आमदार सिद्धार्थ कुकळ्येकर, दयानंद सोपटे, दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, रूपेश कामत, शर्मद रायतूरकर व इतर उपस्थित होते.
महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून ही बैठक झाली. आमदार दाजी साळकर, केदार नाईक, प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर, माजी आमदार सिद्धार्थ कुकळ्येकर, दयानंद सोपटे, दामू नाईक, माजीराज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच रूपेश कामत, शर्मद रायतूरकर व इतर पदाधिकारी मिळून २० ते २२ जण या बैठकीत सहभागी झाले.
आम्ही चिपळूणमध्ये आलो असून आगामी काळातील प्रचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोकणामध्ये गोव्याचे आमदार आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वावरतील, असे तानावडे यांनी सांगितले.
पश्चिम बंगालचे भाजपचे सहसंघटनमंत्री सतीश धोंड, महाराष्ट्राचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते.
डोंबिवली, महाडपासून सावंतवाडीपर्यंत तसेच इतर मिळून कोकणातील ३९ मतदारसंघांची जबाबदारी गोवा भाजपा नेत्यांकडे देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे आता रत्नागिरी, चिपळूण या भागातही सक्रिय झाले आहेत. काल दिवसभर ते त्याच भागात होते. बैठकांमध्ये व्यस्त होते. गेल्या आठवड्यातही ते रत्नागिरी, चिपळूण वगैरे भागांचा दौरा करून आले. महाराष्ट्रात आता यापुढे विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीची पूर्वतयारी भाजपने कधीच सुरू केलीय. विश्वजित राणे यांच्याकडे अनेक मतदारसंघ कोंकण व परिसरात प्रभारी म्हणून सोपविले गेले आहेत. गोव्याची टीम काल दाखल झाली, पण कोकणात तत्पूर्वीच विश्वजित यांनी डेटा गोळा करून त्यानुसार रणनीती सुरु केलीय. तिथे काही कॉल सेंटरही म्हणे, ते सुरू करणार आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांच्या, काही पूर्वीच्या भाजपवाल्यांच्या, ज्येष्ठ कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक यांच्या गाठीभेटी ते सिंधुदुर्गात घेत आहेत