गोवा खबर: भाजप सरकारने प्रत्येक निवडणुकीत खाणकाम पुन्हा सुरू करण्याबाबत खाण अवलंबितांना फसवले असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी केला आणि त्यांच्या आश्वासनांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
इंडिया आघाडीचे प्रवक्ते तुलिओ डीसूझा, गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा आश्मा बी आणि आपचे उपाध्यक्ष संदेश तळेकर देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन खाणकाम, पक्षांतर आणि कोळसा हाताळणीच्या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर टिका केली.
“माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण घोटाळ्याचा आरोप केला होता आणि सभापतींच्या कार्यालयात पीएसी अहवाल सादर केला होता. खाणकामात 3500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण नंतर त्याचे काहीच झाले नाही,” असे डिसूझा म्हणाला.
‘‘हा घोटाळा 35000 कोटी रुपयांचा असू शकतो, असे शाह आयोगाने म्हटले होते. 2013 मध्ये भाजप सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. या तपासात काय झाले आणि त्यात कोणाचा सहभाग होता हे सरकारने सांगावे,” असे तुलिओ डिसूझा म्हणाले.
आरोग्यमंत्री Vishwajit P RANE यांच्यातर्फे पंतप्रधान Narendra Modi यांचे गोव्यात हार्दिक स्वागत!
‘काँग्रेसवर आरोप करून सत्ता बळकावण्यासाठी खाण घोटाळ्याचा वापर केला का, हे भाजपने सांगावे. लोकांना याची माहिती मिळायला हवी,” असे ते म्हणाले.
संकल्प आमोणकर यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजपात गेल्यानंतर कोळशाच्या प्रश्नावर एक शब्दही उच्चारण्यात ते अपयशी ठरले आहेत.
“संकल्प अमोणकर मुरगावातील कोळसा हाताळणीचा मुद्दा का घेत नाही? कोळसा वाहतुकीमुळे परिसरातील लोकांना त्रास होत आहे,” असे ते म्हणाले.
आश्मा बी म्हणाल्या की, भाजप पक्षांतराला प्रोत्साहन देत आहे आणि लोकशाहीची हत्या करत आहे. “ते लोकांचा जनादेश लुटतात. ते लोकांचा आवाज दाबतात. जेव्हा ते पक्षांतराला प्रोत्साहन देतात तेव्हा त्यांना संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे त्या म्हणाल्या.
भाजप आमदार खरेदी करून संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या.
‘‘2012 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’ (FOGG) ने चालवलेल्या राजकीय जाहिरातीची आठवण करून देत आश्मा यांनी प्रश्न केला की हा गट ज्यांना लक्ष्य करत होता त्यांच्या विरोधात का बोलत नाही? “हे पक्षांतर करणारे आता भाजपमध्ये आले म्हणून ते गप्प आहेत का,” असा प्रश्न तिने केला.
संदेश तळेकर देसाई म्हणाले की, कोळसा हाताळणी बंद करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले असले तरी कोळसा हाताळणी सुरूच आहे. “लोक कोळसा हाताळणीच्या विरोधात आहेत. पण हे डबल इंजिन असूनही सरकारने कोळसा हाताळणीसाठी पर्यावरण मंजुरी दिली आहे,” असे ते म्हणाले.
“संकल्प आमोणकर यांनी एपीए सोबत सेटिंग केले आहे की नाही हे स्पष्ट करावे,” असे ते म्हणाले.