गोवा खबर: भाजप सरकारच्या स्मार्ट सिटी कामांच्या अर्बन नक्षलवादाने आणखी एका निष्पापाचा जीव घेतला. शासनाच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि उद्धटपणामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका कुटुंबात अंधार पसरला . आता कारणे देणे थांबवा आणि जबाबदारी निश्चित करुन बेजबाबदार असलेल्यांवर कारवाई करा अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली असून, शोकाकुल कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या असुरक्षित खड्ड्यात दुचाकी पडल्याने रायबंदर येथील आयुष रुपेश हळर्णकर या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सदर घटनेस जबाबदार असलेल्या सर्वांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
पणजीतील पीपल्स हायस्कूलजवळील असुरक्षित व उघड्यावर असलेल्या खड्ड्याचा पर्दाफाश दोनच दिवसांपूर्वी पत्रकार व माध्यमांनी केला होता. परंतु बेजबाबदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कारभाराने आज दुसरा मृत्यू झाला, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) ने सुमारे 1500 कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा जो बोजवारा उडाला आहे त्याला कारणीभूत असलेल्या अर्बन नक्षलवाद्यांची नावे जाहिर करण्याचे धाडस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दाखवतील का? दोघांचे जीव घेणाऱ्या, अनेकांना जखमी करणाऱ्या आणि शेकडो वाहनांचे नुकसान करणाऱ्या दोषींवर सरकारने आजपर्यंत काय कारवाई केली हे मुख्यमंत्री उघड करतील का? असा संतप्त सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाची कामे करून राज्याच्या तिजोरीची लूट करणाऱ्या अर्बन नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदर्श निर्माण करावा. भाजप सरकारच्या आशिर्वादानेच गोव्यातील हा अर्बन नक्षलवाद कार्यरत असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
स्मार्ट सिटी आणि अमृत मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मी पुन्हा एकदा करतो. सरकारने जर माझी मागणी नाकारली तर या कामातील भ्रष्टाचार हा भाजप सरकारच्या आशीर्वादाने झाला असल्याचा आमचा दावा खरा ठरेल, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.