दहशतवाद लोकांना विभाजित करतो, मात्र पर्यटन त्यांना एकत्र आणते : पंतप्रधान
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे ब्रीदवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हेच जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य ठरू शकते: पंतप्रधान
पर्यटनाची ताकद वापरुन, आपण पुढच्या पिढ्यांसाठी जगाला अधिक चांगले स्वरूप देऊ शकतो : जी. किशन रेड्डी
जी-20 पर्यटन आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांच्यासाठी एक ऑनलाईन डॅश बोर्ड स्थापन करुन, जी-20 देशांमधील सर्वोत्तम पद्धती आणि अध्ययन अहवाल सामाईक करुन, त्याद्वारे शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करता येतील : जी किशन रेड्डी
गोवा खबर:गोव्यात आयोजित जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संदेश दिला.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना पंतप्रधानांनी अतुल्य भारताची भावना जागृत करण्याचे आवाहन केले.जागतिक स्तरावर दोन ट्रिलियन डॉलर्सचे क्षेत्र हाताळत असले तरी पर्यटन मंत्र्यांना क्वचितच स्वतः पर्यटक होण्याची संधी मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्राचीन संस्कृत श्लोक ‘अतिथी देवो भवः’ वर आधारित आहे, याचा अर्थ ‘अतिथी म्हणजे देवाचे रूप ’असा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात जी -20 अध्यक्षपदाच्या काळात देशभरातील 100 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 बैठका आयोजित केल्या जात आहेत आणि प्रत्येक बैठकीच्या वेळी, प्रतिनिधींना भारतात वेगळी अनुभूती येत आहे.“ ज्यांनी या बैठकांसाठी याआधी भारताला भेट दिली आहे त्या तुमच्या मित्रांना तुम्ही विचारा , मला खात्री आहे की त्यांचे दोन अनुभव सारखे नसतील,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताचे प्रयत्न समृद्ध वारसा जतन करण्यावर केंद्रित आहेत, असे पंतप्रधानांनी विशद केले. भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासावर भर दिला. वाराणसी हे प्राचीन काळापासून असलेले शहर प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे. या शहरात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली असून आजघडीला त्यांची संख्या 7 कोटी झाली आहे. भारत पर्यटनासाठी नवीन आकर्षणे निर्माण करत आहे हे त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उदाहरण देऊन सांगितले. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून अनावरण झाल्यानंतर एका वर्षातच सुमारे 2.7 दशलक्ष पर्यटक या स्थळाला भेट द्यायला आले असे पंतप्रधान म्हणाले. शाश्वत विकासाची उद्दिष्टे वेगाने गाठण्यासाठी भारताला पर्यटन क्षेत्राच्या समर्पिततेची जाणीव होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
“दहशतवाद फूट पाडतो पण पर्यटन एकत्र करतो”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. पर्यटनामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या (युएनडब्ल्यूटीओ) भागीदारीत जी 20 पर्यटन डॅशबोर्ड विकसित केले जात आहेत. हे डॅशबोर्ड सर्वोत्तम पद्धती, तपशीलवार अभ्यास आणि प्रेरणादायी कथा एकत्र आणणारे या प्रकारातील पहिले व्यासपीठ असेल, असे मोदी म्हणाले. पर्यटनाच्या परिवर्तनीय शक्तीची जाणीव होण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांना विचारविमर्श आणि ‘गोवा रोडमॅपमुळे चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “भारताच्या जी20 अध्यक्षतेचे ब्रीदवाक्य, ‘वसुधैव कुटुंबकम्’ – ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य होऊ शकते,” असे ते पुढे म्हणाले.